रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, : मुंबई-गोवा महामार्गावर चरवेली येथे गॅस टँकर उलटून वायुगळती झाल्यामुळे बंद पडलेली वाहतूक ७ तासांनी सुरू झाली आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंब्यानजीक असलेल्या चरवेली येथील वळणावर गॅसचा टँकर उलटून वाहतूक गळती सुरू झाली. काल, ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. पोलिसांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक बंद केली. पूर्ण धोका टाळल्यावर सात तासांनी आज सकाळी वाहतूक सुरू करण्यात आली.
अपघातातील गॅस टँकर (क्र. यू.पी.-७० सीटी ९९९९) हा वळणावर डाव्या बाजूला उलटला. लोकांनी तातडीने त्या टँकरचा चालक बिरपाल प्रेमणारायण सिंग (वय ५७, रा. उत्तर प्रदेश) बाहेर काढले. त्यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली होती. त्यातून चालकाला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या टँकरमधून वायुगळती होत होती. त्यामुळे लागलीच अग्निशामक दल, एमआयडीसी रत्नागिरी नगर परिषद यांना फोन करून बोलावले. तसेच जिंदल कंपनीचा टँकर असल्याने त्यांना कळवले.
रात्री साडेअकरा वाजता अपघात झाला होता. तातडीने महामार्गावरील वाहतूक थांबवली. ती पालीजवळील बावनदीमार्गे वळवण्यात आली. जिंदाल कंपनीचे तंत्रज्ञही तातडीने घटनास्थळी आले व त्यांनी गळती बंद केली. त्यानंतर सकाळी ६.२५ ला सुमारे सात तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
हातखंबा महामार्गाचे पोलीस, पाली दूरक्षेत्राचे पोलीस, तसेच रत्नागिरी येथील ग्रामीण पोलीस रात्रभर घटनास्थळी होते.
