मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : ‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ हे घोषवाक्य घेत महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसीय ‘विचार शिबीर’ ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर यादिवशी कर्जत (रायगड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विधीमंडळ सदस्य आणि लोकसभा सदस्य, मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटलचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी असे निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.
संसदीय अधिवेशन ४ डिसेंबर आणि ७ डिसेंबरपासून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे डिसेंबर महिना हा यामध्ये जाणार आहे तर जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीचे वेध लागू शकतात अशावेळी एनडीए आणि महायुती सरकारमधील घटक म्हणून एकत्रित निवडणूकीला सामोरे जायचे आहे त्यामुळे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली राजकीय भूमिका आणि महायुतीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा सहभाग त्यातून राज्यसरकारच्या माध्यमातून केलेली उल्लेखनीय कामगिरी व राजकीय भूमिका ठळकपणे समोर ठेवून त्यातून विचारमंथन, चर्चा आणि कार्यकर्त्यांना काय वाटते ते समजून घेणे व येणाऱ्या आव्हानांना पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने भूमिकेशी समरसपणे सामोरे जाणार आहोत. हे विचार शिबीर त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा पूर्व विदर्भातील सहा जिल्हयात पार पडला. या दौऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
हे नवीन वर्ष देशातील आणि राज्यातील बळीराजाला सुखसमृध्दीचे, प्रगतीचे जावो अशा शुभेच्छाही सुनिल तटकरे यांनी दिल्या.
या पत्रकार परिषदेला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
