परभणी, 5 सप्टेंबर (हिं.स.)। ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळगांव शिवारात शेतातील रस्त्याच्या वादातून उसळलेल्या हाणामारीचा रक्तरंजित शेवट आता आणखी भीषण झाला आहे. शेतकऱी सासरा विलास शिंदे यांच्या हत्येनंतर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय जयश्री चंद्रकांत शिंदे यांचा परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या वादाने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला आहे.
फिर्यादी चंद्रकांत विलास शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कुबेर दादाराव माने, आरोपी कैलास उर्फ बाळू साहेबराव होणमने या दोघांनी “शेत रस्त्याच्या वादातून” या शेतातील आखाड्यावर थेट हल्ला चढवत चाकुने सपासप वार करून हल्ल्यात विलास उत्तमराव शिंदे (वय ५०) यांना पोटात चाकू मारून ठार करण्यात आले. त्याच वेळी सिंधूबाई विलास शिंदे व जयश्री चंद्रकांत शिंदे या दोन महिलांना गंभीर जखमी करण्यात आले होते.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृत्यूशी झुंज अखेर संपली
जखमी झालेल्या जयश्री शिंदे यांच्यावर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सात दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मयत महिलेच्या मागे चार मुली असून त्यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेत रस्त्याच्या किरकोळ कारणांवरून घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात संताप व भीतीचे वातावरण आहे. एका छोट्याशा वादामुळे दोन जणांचा बळी जावा, यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाच्या वतीने तालुक्यात शेत रस्त्याच्या जमीनीचे शेकडो वाद प्रलंबित आहेत. प्रकरणे वेळीच हस्तक्षेप करून निकाली काढत शेत रस्त्याच्या वाद मिटविवल्यास अशा घटनांना आळा बसेल परंतु सुस्त निद्रिस्त प्रशासन तातडीने कारवाई करत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
