
इस्लामाबाद, १५ नोव्हेंबर (हिं.स.) : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली. त्या पार्श्वभूमीवर गोलंदाजी प्रशिक्षकानंतर आता कर्णधार बाबर आझम याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बाबर आझम याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेअरमनची (पीसीबी) भेट घेतली. त्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
विश्वचषकात फलंदाजी आणि नेतृत्वात सपशेल अपयशी ठरल्यानंतर पीसीबीकडून बाबर आझम याच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत नेतृत्व सोडल्याचे जाहीर केले.
विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी
भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने सुमार कामगिरी केली. पाकिस्तान संघाने सुरुवातीचे दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली. पण तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तान संघाने आठ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानले. नऊ साखळी सामन्यात पाकिस्तानला फक्त चार विजय मिळवता आले. आझम याला स्पर्धेत एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याकडून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण चाहत्याचा भंग झाला. नेतृत्वातही बाबर कमाल करू शकला नाही. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या खराब कामगिरीसाठी त्याला जबाबदार धरले. संघाचे माजी दिग्गज खेळाडू रमीझ राजा सुद्धा चांगलेच संतापले.
बाबर काय म्हणाला?
2019 मध्ये मला पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळाले. मागील चार वर्षांत मैदानावर आणि मैदानाबाहेर मी अनेक चढउतार पाहिले. पाकिस्तानचा सन्मान आणि आदर क्रिकेटविश्वात काय ठेवण्याचं ध्येय ठेवले. मर्यादित षटकात पाकिस्तान संघाला नंबर एकपर्यंत पोहचवले. त्यासाठी प्रशिक्षक, सहकारी यांच्यासह सर्व चाहत्यांचा मोलाचा वाटा राहिला. माझ्या प्रवासात चाहत्यांच्या पाठिंबाही महत्वाचा आहे.
आज मी तिन्ही प्रकारचं कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी हे कठीण आहे, पण यावेळी हा निर्णय घ्यावाच लागेल. पाकिस्तानसाठी खेळणं सुरूच ठेवणार आहे. नवीन कर्णधाराला माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. आतापर्यंत सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि चाहत्यांचे खूप सारे आभार…
हिंदुस्थान समाचार
