डोंबिवली, १७ ऑक्टोबर : पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचायतींमधील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांनी दिली आहे.
नरेंद्र सुर्यवंशी यांनी याविषयी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. कौशल्य विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील महायुती सरकारने ५०० ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना पूर्णत्वास गेली असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
तरुणांना आपल्या गावातून शहरात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागू नये या दृष्टीने कौशल्य केंद्राची संकल्पना महत्वाची आहे. राज्यातील या केंद्रांची संख्याही भविष्यात वाढवण्यात येईल. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास, महिला व बालविकास विभागांचा या योजनेमध्ये सहभाग असणार आहे अशी माहितीही नरेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.
प्रत्येक गावात उद्घाटनाच्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, वीज पुरवठा या सर्व सोयी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या योजनेत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
