चंद्रपूर 8 ऑक्टोबर : – प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी व प्रगतशील शेतकऱ्यांचे एक दिवसीय शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाच्या माहितीसह खरेदी-विक्री व्यवस्थेचे मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पिकास पर्याय म्हणून मोहरी, चीया, करडई आणि जवस या पिकांची रब्बी हंगामात लागवड करून अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने, शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकामार्फत मोहरी, चीया, जवस या पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची माहिती व खरेदी, विक्री व्यवस्था याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, अकोला येथील जागर शेतकरी उत्पादक कंपनीचे अभिजीत पाटील, श्याम मानवटकर, वाशिम येथील यशोसाई ऍग्रो प्रायव्हेट लिमि.चे उमेश कठारे, किनखेडा रिसोड (वाशिम) येथील हरीओम अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचे गजानन अवचार, उमेश लहाने व गुलाब राऊत, राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे नरेंद्र जीवतोडे, सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा व स्मार्ट प्रकल्पातील कर्मचारी तसेच शेतकरी, शेतकरी गट प्रतिनिधी आणि उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
