सोलापूर 17 ऑक्टोबर ( हिं.स) :आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाढते तापमान रोखण्याकरिता पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. ते प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सहाय्यक महसूल अधिकारी तृप्ती पुजारी यांनी येथे केले.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघम आणि महापालिका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी घेण्यात आलेल्या ”सेल्फी विथ ट्री” वृक्षारोपण स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी सहाय्यक महसूल अधिकारी तृप्ती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर श्री स्वामी समर्थ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा यलगुलवार, पत्रकार संघाचे सल्लागार प्रशांत जोशी, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का, नरेंद्र धारा, नागेशकुमार गंजी, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सोलापूर शहरातील लहान मुली, युवती व महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आलेल्या फोटो मधून मान्यवरांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. प्रस्ताविक ममता मुदगुंडी यांनी तर सूत्रसंचालन कला चन्नापट्टण यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
