अकोला, 2 जानेवारी(हिं.स.) : संशोधक विद्यार्थ्याची मोठी फसवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे येथील अधिकारी तसेच मंत्रालयात बसलेल्या सुमंत भांगे नावाचे सचिव दर्जाच्या अधिकारी ह्यांनी चालवली असून जा.क्र/वार्टी-पुणे अधिछात्रवृत्ती२०२३-२४/६६७० ३० डिसेंबर २०२३ रोजी BANRF-२०२२ बाबत घोषणापत्र महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे ह्यांनी काढले होते.त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधक अधिछात्रवृत्ती (BANRF) -२०२२ साठी आगामी १० जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आले होते.मात्र आज मंत्रालयात झालेल्या बैठकी नंतर आज हा निर्णय फिरण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI यांच्याशी समान धोरणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेतली नसल्याने पत्र क्र. जा. क्र. बार्टी/अधिछात्रवृत्ती विभाग/२०२३-२४/६६६८, दिनांक २९/१२/२०२३. पत्र क्र. जा. क्र. बार्टी/अधिछात्रवृत्ती विभाग/२०२३-२४/६६६७, दिनांक २९ डिसेंबर २०२३ हे याद्वारे मागे घेण्यात येत आहे. तरी परिक्षा ठरलेल्या तारखेनुसार १० जानेवारी रोजी घेण्यात येईल, याची सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.असे सुनिल वारे, महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ह्यांनी जाहीर केले आहे.
मुळात प्रचलित पद्धतीनुसार विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेद्वारे पीएच. डी.साठीचे प्रवेश देतात किंवा आतापर्यंतच्या नियमांनुसार पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर, विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा, एमफिल आणि नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत देऊन, पीएच. डी.ला प्रवेश मिळवता येत होता. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा आणि आठ सत्रांचा पदवी अभ्यासक्रम किमान ७५ टक्के गुणांसह किंवा पदवीनंतर एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पीएच. डी.ला प्रवेश घेता येते असा नियम २०२२ मध्ये युजीसी ने केला आहे.PhD साठी पात्र होण्यासाठी NET, SET, PET या परीक्षा पात्र झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पीएचडी साठी पात्र ठरतात व त्यानंतर पात्र संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतात मुलाखतीनंतर पात्र विद्यार्थ्यांकडून संशोधन अहवाल मागवण्यात येतो व तो अहवाल विद्यापीठाच्या scrutinized committee पाठवण्यात येतो scrutinized committee च्या मान्यतेनंतरच संशोधक विद्यार्थ्यांचे final admission होते
तरी देखील बार्टी, सारथी, महाज्योती ह्या तिन्ही संस्था मध्ये चाळणी परीक्षा हे थोतांड सुरू केले आहे.बार्टी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली असून, राज्यभरात ही परीक्षा झाली होती.२०१९ च्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका पुन्हा २०२३ च्या परीक्षेत विध्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे २०१९ च्या पेपरची जशाच तशी कॉपी करण्यात आली आहे. अगदी प्रश्न आणि प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता.२०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर २०२३च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला होता. त्यावर कुठलीही कार्यवाही न करता पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याचा घाट घातला गेला असून युवा आघाडीने सरकारला न्यायालयात खेचण्याची प्रक्रिया सुरू केली असून बार्टी, सारथी, महाज्योती ह्या तिन्ही संस्था मध्ये सुसूत्रीकरण नावावर सुरू असलेले गैरप्रकार आणि मनमानी खपवून घेणार नाही असा इशारा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.युवा आघाडीचे पदाधिकारी ऍड अफरोज मुल्ला हे जनहित याचिका तयार करणार असून युवा आघाडीचे विशाल गवळी, ऋषीकेश नांगरे पाटील तसेच पुणे युवा अध्यक्ष सोमनाथ पानगावे, महासचिव शुभम चव्हाण आणि पिंपरी चिंचवड युवा अध्यक्ष नितीन गवळी व टीम कामाला लागली आहे.
हिंदुस्थान समाचार
