पुणे, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। पुणे महानगर पालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात २५ तृतीयपंथीयांना नोकरीवर घेण्यात आले. पुढे टप्प्याटप्ययाने ही संख्या वाढत आहे. याशिवाय पालिकेच्या इतर विभागांकरीता लागणारे मनुष्यबळासाठी याच लोकांचा विचार होणार आहे.
तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदललेला नसला तरी काही प्रमाणात अपेक्षित बदल दिसून येतोय. या बदलामध्ये पुणे महागनरपालिकेचं अनोखं योगदान आहे. तृतीयपंथीयांना स्वतःच्या पायावर उभं करुन त्यांना सन्मानाचं जीवन पालिकेने देऊ केलं आहे. हा उपक्रम राज्य शासनाने, विविध संस्थांनी राबवणं गरजेचं आहे.सेक्युरिटीचं काम करणारे काही तृतीयपंथीय सांगतात, आमच्या घरच्यांनी आमची हेटाळणी केली, समाजाने आम्हाला नाकारलं, आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता, खालच्या स्तरावर जाऊन लोक बोलायचे.. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आम्हीदेखील इतरांप्रमाणे काम करुन स्वतःचं पोट भरु शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
