मुंबई, ४ डिसेंबर (हिं.स.) : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा या चार राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने तीन राज्यांत मोठा विजय संपादित केला. तर काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो पदयात्रा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. खोटी खोटी आश्वासने त्यांनी दिली. जे जमणार नाही तेही जाहीर करा असे सांगितले. त्यामुळे राहुल गांधी यांना जनतेने फेकून दिले आणि मोदींच्या भाजपावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे दरेकर म्हणाले.
चार राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, एक्झिट पोलने जेजे अंदाज दिले होते त्यावेळी काही लोकं उथळ झाले होते. आम्ही अत्यंत संयमाने सांगितलेले या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. जनता भाजपाच्या बाजूने आहे. त्यामुळे या निवडणुकांत अत्यंत प्रचंड यश भाजपाला मिळाले आहे. मध्यप्रदेशमध्ये दुप्पट काँग्रेसच्या जागा आम्हाला मिळताहेत. राजस्थानमध्येही ११५ च्या वर जागा आज आम्हाला मिळताना दिसत आहेत. जी मोठी राज्य होती, ज्या राज्यात भाजपाचा सफाया होणार, काँग्रेसची लाट असे ढोल बढवले जात होते त्याचे उत्तर प्रत्यक्षदर्शी निकालातून मिळाले आहे. छत्तीसगडमध्येही काटे की टक्कर आहे. तिथेही सरकार भाजपा बनवेल. तेलंगणातील बोथ, आदिलाबाद जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा मी जे वातावरण पाहिले ते बीआरएस विरोधात होते, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी ‘लाडली बहना’ योजना आणली ती प्रचंड लोकप्रिय होती. तेथील जबलपूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर होती. महिलांच्या जेव्हा बैठका घ्यायचो त्याला ४०० ते ५०० महिला उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास व्यक्त करत होत्या. नेतृत्व कोण असावे याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. मध्य प्रदेशबाबतही निर्णय घेतील.
दरेकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या माध्यमातून या देशातील जनतेचा विश्वास संपादित केला. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आपली सामाजिक बांधिलकी लोकांशी आहे या भावनेतून पक्षाचे, निवडणुकीचे आणि विकासाचे काम केले. त्यामुळे जनतेने भविष्यात हे काम करू शकतात यावर विश्वास व्यक्त केला. ही केवळ लाट नाही तर मोदींचे कर्तृत्व, काम लोकांनी नाकारले नाही. त्यामुळे नाकाने जे कांदे सोलत होते त्यांना चपखळ असे उत्तर मिळाले आहे.
तसेच ज्या-ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेले त्या-त्या ठिकाणी भाजपाला चांगले यश मिळाले आहे. जर इतर राज्यांत जाऊन त्यांना प्रतिसाद मिळतोय तर महाराष्ट्रात त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. ५ वर्ष मुख्यमंत्री, नंतर अडीच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून आणि आता मुख्यमंत्री नसले तरी सरकार चालवताना महाराष्ट्राला विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात लोकसभेला भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात शंभर टक्के यश मिळवून देतील, असा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
भाजपा देशासाठी काम करणारा पक्ष
दरेकर म्हणाले की, काँग्रेस स्वतःसाठी काम करते. गट कधी होतात जेव्हा नेते स्वतःसाठी आग्रही असतात. गटातटात विभागलेले काँग्रेस आहे त्याचा फटका त्यांना बसला. परंतु भाजपा ही देशासाठी, जनतेसाठी काम करते. गट-तट आमच्यातही वेगवेगळ्या ठिकाणी होते. परंतु जेव्हा लोकांचा, पक्षाचा विषय येतो त्यावेळी सर्व गोष्टींना तिलांजली देत आम्ही मतभेद संपवले. चांगल्या पद्धतीने, एकोप्याने निवडणुका लढवल्या त्याचे हे यश आहे.
हिंदुस्थान समाचार
