* दरेकरांच्या मागणीवर कृषीमंत्री मुंडे यांची घोषणा
नागपूर, 19 डिसेंबर (हिं.स.) – भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात कोकणातील आंबा, काजू उत्पादकांबाबत प्रश्न उपस्थित केला. कोकणात आंबा, काजू ही काही पिकं आहेत त्यावर प्रोसेसिंग आणि स्टोरेज करण्यासंदर्भात मोठी योजना किंवा घोषणा शासनाकडून अपेक्षित असल्याची मागणी दरेकरांनी केली. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आंबा, काजुची न मिळालेली विमा रक्कम लवकरात लवकर कोकणातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी घोषणा केली.
सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले की, आमचा संबंध पेरणी आणि कापणीपुरता आहे. चांगले पेरले तर चांगलेच उगवणार आहे आणि तेच काम हे सरकार करत आहे त्याबद्दल कृषीमंत्र्यांचे अभिनंदन करतो. कोकण विकास प्राधिकरणाला ५०० कोटी रुपये देताय हा कोकणातील जनतेसाठी मोठा दिलासा आहे. कोकणचा कैलिफोर्निया करू असे काही नेते बोलले होते परंतु कोकणचा कैलिफोर्निया झाला नाही. कोकणात आंबा, काजू जी काही पिकं आहेत त्यावर प्रोसेसिंग आणि स्टोरेज करण्यासंदर्भात मोठी योजना किंवा घोषणा अपेक्षित आहे. तसेच हवामानाचा अंदाज आल्यावर आपण अलर्ट करतोच परंतु जिल्हाधिकारी किंवा तत्सम जी यंत्रणा आहे त्यांनी जी काळजी घ्यायची असते ती न घेतल्यामुळे जे होणारे नुकसान आहे त्यावर शेतकरी काळजी घेऊ शकले नाही. माणगाव येथे कापलेल्या भाताचे नुकसान झाले आहे. परंतु आपण त्यांना काहीच नुकसानभरपाई दिलेली नाही याची दखल घ्यावी अशी मागणी केली.
यावर बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, आंबा, काजुची न मिळालेली विमा रक्कम लवकरात लवकर कोकणातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. काजू, आंबा यांसह इतर फळांवर कोकणात ज्या काही प्रक्रिया करून शेतकऱ्यांना फार मोठी मदत करण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक करावी लागेल यासाठी शेतकी विभाग योजना लागू करेल. येणाऱ्या एक वर्षात २२ हजार ग्रामपंचायतींवर मदत पुनर्वसन कृषी विभाग आणि केंद्र सरकार मिळून वॉटर गेज बसविण्याचा निर्णय करणार असल्याचेही मुंडे म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
