सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. गल्लोगल्ली दिवसभर कर्णकर्कश आवाजाची ध्वनीयंत्र कोकलत आहेत. महिलावर्ग विशिष्ट एका रंगाच्या साड्या परिधान करत आहेत. रात्रभर दांडिया,गरब्याच्या नावाखाली धिंगाणा सुरू आहे. पण या सर्वांमध्ये नवरात्रोत्सव म्हणजे काय? कुणाचा उत्सव? कुणाचा जागर? शक्ती म्हणजे काय? तिचे स्वरुप काय? याची कुणालाच काही पडलेली नाही. मुळात आदिशक्ती किंवा शक्ती म्हणजे काय? हे माहीत नाही आणि शक्तीचे स्वरुप जाणून घेण्यात कुणाला रसही नाही.
दुर्गा स्तोत्रामध्ये धर्मराज शक्तीचे वर्णन करताना म्हणतात, मेळवुनी पंचभूतांचा मेळl तुवा रचिला ब्रम्हांडगोळ l इच्छा परतता तात्काळ l क्षणांत निर्मूळ करिसी तू ll अर्थात जी पंचभूतांचा मेळ घालून ब्रम्हांडाची निर्मिती करू शकते आणि क्षणांत ते नष्ट करू शकते अशी विश्वाची उत्पत्ती आणि लय करू शकणारी विश्वाची मालकीण आहे. तिच्या तेजाचे वर्णन करताना धर्मराज म्हणतात, अनंत बाल सूर्यश्रेणी l तव प्रभेमाजी गेल्या विरोनी ll
श्री देवीसुक्तमध्ये, अतिसौम्यातिरौद्रायै असे देवीच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. अर्थातच आदिशक्ती ही भक्तवत्सल आहे. विश्वव्यापक आहे. चराचर जीव सकल व्यापक जगत् जननी आहे.
मूळात शक्ती ही एकच आहे परंतु प्रसंगानुरूप तिने वेगवेगळी रुपे घेतली आहेत. जशी वीज ही एकच आहे पण पंखा, विद्युत रोषणाई, ध्वनीयंत्र अशा अनेक स्वरुपात तिचा वापर केला जातो. तशी शक्ती ही एकच आहे. रोजच्या जीवनातील उदाहरण सांगायचे म्हणजे एखादी स्त्री तिच्या मुलांसाठी प्रेमळ आई होते. पतीसाठी त्याची पत्नी होते. प्रपंच सांभाळताना ती उत्तम गृहिणी होते. तेच मुलावर किंवा घरावर काही संकट आल्यास ती रणचंडिका होते. म्हणजे स्त्री एकच पण वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. त्याचप्रमाणे शक्ती ही एकच आहे. प्रसन्नमुद्रेमध्ये ती भक्तवत्सल महालक्ष्मी होते. विद्यादायिनी सरस्वती होते. दुर्जन, दैत्य मर्दनासाठी ती दुर्गा, चामुंडा, महाकाली अशा उग्र रणचंडिका स्वरुपात प्रगट होते.
सात्विक साधक लक्ष्मी, सरस्वती अशा स्वरूपातील देवीची आराधना करतो. कोणी सामर्थ्य प्राप्तीसाठी दुर्गा, महाकाली स्वरूपातील देवीची सेवा, उपासना करतो तर तांत्रिक साधक दशमहाविद्येतील उग्र शक्तींची उपासना करतो. साधक ज्या स्वरुपात शक्तीला आवाहन करतो त्याप्रमाणे शक्ती प्रगट होते. महाकालीचे उग्र रूपदेखील साधकाला प्रेमळच वाटते. कारण ती संहारक रौद्रमुद्रा ही दुर्जन, दैत्य असुर यांच्यासाठी भयदायक आहे. साधकाला त्याचे कसले भय? तो तर तिचा बालक आहे. प्रत्यक्ष काळावरसुद्धा मात केली आहे अशा महाकालीचा वरदहस्त मस्तकी लाभल्यावर साधकाला भय ते काय उरले?
महिला दिनाच्या टिमक्या वाजवणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की जागतिक महिला दिन अवघ्या काही दशकांपूर्वी सुरू झाला आहे. पण भारतामध्ये सहस्र वर्षांपूर्वीपासून एक दिवस नव्हे तर तब्बल नऊ दिवस महिला दिन साजरा होतो आहे. आपल्या तोकड्या वैचारिक कुवतीमुळे हे आपल्याला अजूनही समजले नाही ही खेदाची बाब आहे. काही धर्मामध्ये आजही महिलांना प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाही. याउलट नवरात्रीत कुमारिका पूजन करणे ही आपल्या संस्कृतीची वैचारिक प्रगल्भता आहे.
हा सर्व लेखनाचा खटाटोप एवढ्यासाठीच की, तोंडाला लाली-पावडर लावून शोभेची बाहुली बनून फक्त नाचण्यासाठी हा सण नसून शक्तीची आराधना करून स्वतःमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण करण्यासाठी शक्तीचा केलेला हा जागर आहे. देवीने नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या कधीच परिधान केल्या नव्हत्या तर देवी हाती शस्त्र घेऊन दानव कुळाचा नाश करत होती. चंड-मुंड, शुंभ -निशुंभ, महिषासुर या दैत्यांचा निःपात करत होती. देवीचे हे स्वरुप समजून घेऊन, तिची आराधना करून स्वतः मध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण करणे हा नवरात्रोत्सवाचा उद्देश आहे.
