मानवी जीवन अमूल्य आहे. विज्ञान, वैद्यक आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे मानवी आरोग्यसेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि जीवनरक्षक झाली आहे. आज अनेक गंभीर आजारांवर उपचार शक्य झाले आहेत; पण काही अवस्थांमध्ये औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया पुरेशी ठरत नाही. अशा स्थितीत अवयव प्रत्यारोपण (Organ Transplantation) हीच अंतिम आणि एकमेव उपचारपद्धती ठरते. मूत्रपिंड निकामी होणे, यकृताचे विकार, हृदय अपयश, कॉर्नियाचे आजार, फुफ्फुसांचे विकार अशा अनेक गंभीर आजारांमुळे हजारो रुग्ण जीव-मरणाच्या संघर्षात दिवसेंदिवस अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर पाळला जाणारा ‘भारतीय अवयव दान दिन’ हा केवळ दिनविशेष नसून मानवतेचे आणि करुणेचे स्मरण करून देणारा दिवस आहे. हा दिवस आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तो प्रश्न म्हणजे “मृत्यूनंतर देह थांबतो, पण त्यातील अवयवांनी इतरांचे जीवन पुन्हा सुरू होऊ शकते, मग आपण का मागे पडतो?”
अवयवदान ही केवळ वैद्यकीय संकल्पना नसून ही संकल्पना समाजशास्त्रीय, सांस्कृतिक, नैतिक आणि भावनिक स्तरांशी जोडलेला प्रश्न आहे. भारतीय समाजात आजही मृत्युनंतर शरीराशी संबंधित संस्कार, धार्मिक श्रद्धा, आत्म्याबद्दलच्या कल्पना, कर्म-फलाची संकल्पना आणि जन्म-मृत्यूचे तत्वज्ञान यांचा माणसाच्या निर्णयांवर मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनेक वेळा अवयवदानाबाबत अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा आणि भावनिक विरोध आढळतो. विशेषतः ग्रामीण भागात आणि कमी सुशिक्षित समाजघटकांमध्ये अवयवदान म्हणजे “शरीर अपूर्ण होणे”, “पुनर्जन्मात शरीर अधूरं मिळणे”, “शरीरावर अत्याचार” असे चुकीचे अर्थ आजही प्रचलित आहेत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता या भीती, श्रद्धा आणि गैरसमजांच्या आड एक मोठा मानवी प्रश्न दबून राहतो तो प्रश्न म्हणजे “जर माझ्या मृत्यूनंतर माझ्या एका निर्णयामुळे कोणाचे तरी जीवन वाचू शकते, तर तो निर्णय न घेणे योग्य आहे का?”*
भारतात अवयव प्रत्यारोपणाची गरज मोठी आहे. सरकारच्या आणि वैद्यकीय संस्थांच्या अहवालानुसार दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षायादीतच मृत्युमुखी पडतात. पण दुसरीकडे दरवर्षी लाखो लोक असे मृत्यूला सामोरे जातात ज्यांच्यातील अवयव दानातून अनेकांचे जीव वाचू शकतात. समाजशास्त्रीय विसंगती अशी की इच्छा असूनही प्रक्रिया, माहिती, नोंदणी आणि जागरूकतेचा अभाव हा अवयवदानाच्या प्रसारात मोठा अडथळा ठरतो. ही परिस्थिती पाहता सामाजिक संस्था, डॉक्टर्स, धोरणकर्ते, माध्यमे आणि नागरिक यांनी मिळून अवयवदानाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे आहे.
अवयवदान ही मूल्याधिष्ठित कृती आहे, त्यामध्ये समता, सहजीवन, मानवी एकात्मता आणि परोपकाराची सर्वोच्च पायरी असते. जेव्हा दाता आणि प्राप्तकर्ता एकमेकांना ओळखत नसतात, धर्म, जात, भाषा किंवा वर्ग फरक नसतो, तेव्हा हा कृतीसमूह मानवी समाजातील सर्वात सुंदर समानतेचा संदेश देतो. अवयवदान ही केवळ एका व्यक्तीची मदत नसून मानवी नात्यांची सीमा मिटवणारी आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करणारी जोपासना आहे. विशेष म्हणजे एका मृत व्यक्तीच्या अवयवांमुळे काही जीवनं वाचू शकतात आणि काही व्यक्तींना जीवनशक्ती, दृष्टी किंवा कार्यक्षम जीवन मिळू शकते.
भारतात कायदेशीर पातळीवर ‘Human Organ Transplantation Act’ हा कायदा अवयवदानाला वैध मान्यता देतो. हा कायदा अवयवांची देवाणघेवाण, विक्री किंवा शोषण टाळण्यासाठी अस्तित्वात आला. परंतु कायदा पुरेसा नाही, सामाजिक बदल आवश्यक आहे. कुटुंबातील चर्चा, शाळांमधील मूल्यशिक्षण, धार्मिक आणि सामाजिक नेत्यांचे मार्गदर्शन, रुग्णालयांची तयारी, मेंदूमृत्यूची (Brain Death) संकल्पना समजावणे आणि डिजिटल अवयवदान नोंदणी या प्रक्रिया जनजागृतीचा महत्त्वाचा भाग ठरतात. आजही अनेक कुटुंबे भावनिक वेदनेत निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण अवयवदानाची कल्पना त्यांना मृत्यूला वेगळ्या नजरेने पाहायला लावते. पण समाजशास्त्रीय अर्थाने पाहता अवयवदान मृत्यूचे अर्थनिर्माण करते, मृत्यूला निरर्थक न ठेवता जीवनाचा विस्तार बनवते.
अवयवदान ही सामाजिक जबाबदारी आहे. जर प्रत्येक व्यक्ती अत्यावश्यक ओळखपत्रांमध्ये जसे PAN, Aadhaar, Driving License तसेच Organ Donor Consent जोडून ठेवला तर भारत अवयवदानात पुढे येईल. तरुण पिढीत जागरूकता वाढत आहे, परंतु वृद्ध आणि ग्रामीण समाजघटकांमध्ये माहितीचा अभाव अजूनही आहे. माध्यमांची भूमिका येथे खूप मोठी आहे. मृत्यूचा भीतीदायक चेहरा न दाखवता नवीन जन्मासारखी जीवनदानाची प्रतिमा समाजात पसरवणे आवश्यक आहे.
अवयवदान म्हणजे फक्त एक कृती नाही, ती एक वारसा आहे. एक पिढीकडून दुसऱ्या पिढीला मानवतेची साथ तेणे आवश्यक आहे. २७ नोव्हेंबरचा हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की डॉक्टर, विज्ञान किंवा तंत्रज्ञान एकट्याने जीव वाचवू शकत नाही. तर त्यासोबतच त्या साखळीत सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे “आपण” आणि आपला निर्णय होय.
जेव्हा शरीर भस्म होते, जमिनीत विलीन होते किंवा समुद्रात सोडले जाते तेव्हा काही शिल्लक राहत नाही. परंतु अवयवदान केले तर आपले हृदय कोणाच्यातरी शरीरात धडधडत राहते, डोळे कोणालातरी नवीन जग दाखवतात, फुफ्फुसे कोणाला स्वच्छ जीवन देतात आणि मूत्रपिंड कोणाला नवसंजीवनी देते. हे फक्त शरीरदान नाही, तर हे जीवनाचा विस्तार आहे, अस्तित्वाचा नवीनर्जन्म आहे.
आज २७ नोव्हेबर रोजी अवयव दान दिनानिमित्त एकच संदेश देता येईल की “मृत्यू अनिवार्य आहे, पण अवयवदान हे अमरत्वाचे दार आहे.” चलो, जागृत व्हा, नोंदणी करा आणि मानवतेच्या या अद्वितीय परंपरेचा भाग बनूया. अवयव दान करून दुसऱ्यांना जीवन द्या, कारण मृत्यूनंतरसुद्धा आपण कोणाच्यातरी श्वासांत जिवंत राहू शकतो.
डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत) – ९९६०१०३५८२
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
