सोलापूर, 29 जानेवारी (हिं.स.) सराव सामने, महाराष्ट्र विरूध्द मणिपूर या रणजी सामन्याचे उत्कृष्ट नियोजन, आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जिल्हा क्रिकेट संघटनेवर आणखीन एक जबाबदारी टाकली आहे.
दरम्यान, २९ वर्षानंतर सोलापुरात होणारा दुसरा रणजी सामना २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) येथे होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
३१ जानेवारी २०२४ ला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू, पंच, सामना अधिकारी सोलापुरात येणार आहेत. त्यांची राहण्यासह जेवणाची उत्तम सोय सोलापुरातील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. या सामन्यासाठी बीसीसीआय व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा रणजी सामना सर्वासाठी खुला आहे. खेळाडू, पालक वर्ग, क्रीडा प्रेमी ही संधी आहे. आपल्या सोलापूरचे नाव लौकीक करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच सहभागाची अपेक्षा आहे. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, खजिनदार संतोष बडवे, सचिव चंद्रकांत रेंम्बर्स, संघटनेचे उमेश मामड्याल, जावेद जमादार, संजय वडजे, राजेंद्र गोटे आदी उपस्थित होते.
