लातूर, 9 ऑगस्ट (हिं.स.)।
नागरिकांत देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर शहरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे.१५ ऑगस्ट पर्यंत एकूण तीन टप्प्यात ही मोहीम राबविली जात आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर हा उपक्रम आधारित आहे. २०२२ पासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून राबविली जाणारी ही मोहीम आता लोक चळवळ बनलेली आहे.या अंतर्गत लातूर शहरात तीन टप्प्यात विविध उपक्रम होत आहेत.
पहिल्या टप्प्यात शुक्रवार दि.८ रोजी सिद्धार्थ सोसायटीतील बौद्ध विहार येथे रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. एलआयसी कॉलनी येथे रांगोळी स्पर्धा व प्रतिज्ञा तर मनपा मुख्यालय तिरंगा थीमवर आधारित वस्तू प्रदर्शन व विक्री सुरू आहे.
दुसऱ्या टप्प्यात सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी मनपाच्या सर्व १६ शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने तिरंगा रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे.मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.वाहन विभागाच्या वतीने आयोजित या रॅलीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आंबेडकरांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार आहे. शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, परत शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई, तेथून परत महानगरपालिका कार्यालयात या रॅलीचे विसर्जन होणार आहे.
बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यात भांडारपाल व शिक्षण विभागाच्या वतीने तिरंगा ट्रिब्यूट आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवानांचे स्मरण तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
