सिंधुदुर्ग, 25 डिसेंबर (हिं.स.) : अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर ‘सुशासन दिवस’ साजरा केला जातो. भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात प्रशासनात अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा देऊन आपआपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गच्या रजिस्टार (प्रबंधक) चारुलता विलास दळवी, गटशिक्षण अधिकारी रमेश पिंगुळकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बाबली वायंगणकर, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी वामन बा.चव्हाण अशा पाच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले कि, सन १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना करताना पं.दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगीतले कि , समाजाच्या सर्वात तळातल्या व्यक्तीला विकासाची संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्याचबरोबर त्याला ही संधी मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी सुशासन आवश्यक आहे. दीनदयाळजींनी कायमच या विषयाचा आग्रह धरला होता. अटलजींनी देखील तेच सुत्र पुढे चालवले होते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.
अटलजींनी आपल्या काळात काही मुल्ये प्रस्थापित करण्यावर भर दिला आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक करीत आहेत. त्यामुळेच ह्या दोन्ही नेत्यांवर व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ शकले नाहीत. मोदी कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी विशेष आग्रही आहेत. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे आपल्या संविधानाने मांडलेले मुलभूत तत्व स्विकारले की मग आप पर भाव न बाळगता कारवाई करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी ठरते. मग सरकार कोणाचेही असो. सुशासन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी ही प्राथमिक अट आहे.
हिंदुस्थान समाचार
