नाशिक, 27 नोव्हेंबर (हिं.स.) : जिल्ह्यात रविवारी विविध भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, असे आदेश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले आहे.
नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून झालेल्या नुकसानीबाबात आढावा घेतला. तसेच कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील मंडलात सबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करून तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्यात यावा अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहे.
हिंदुस्थान समाचार
