* व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस ॲपचे उद्घाटन
मुंबई, 1 फेब्रुवारी : – महाराष्ट्रातील दुष्काळाचा इतिहास पाहता पाण्याची बचत करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. चांगल्या पर्यावरणासाठी वाय वेस्ट वायईडब्ल्यूएस(Why Waste YEWS) ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी वाय वेस्ट वायईडब्ल्यूएस(Why Waste YEWS) ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्डचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,उपसचिव अशोक मांडे,उपसचिव अजित बाविस्कर, युनिसेफ मुंबई कार्यक्रमाचे अधिकारी बालाजी व्हरकट, युनीसेफ मुंबई सल्लागार प्रियांका शेंडगे, श्रुती गणपत्ये,ग्रीन स्कीलिंग प्रकल्प अधिकारी स्नेहा गौर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा वॉटर स्टुअर्डशिप कार्यक्रम तरुणांच्या सहभागातून आणि शाश्वत पद्धतींद्वारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी तयार केला असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ७,लाख १० हजार तरुणांना सक्षम करणे, त्यांना साधने पुरवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि एकत्रितपणे पाणी, पर्यावरण आणि शाश्वतता यावर काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. कृती आणि कल्पनांद्वारे, हे स्वयंसेवक राज्यातील २.७ दशलक्ष लोकांना प्रेरित आणि प्रभावित करतील ज्यातून लक्षणीय पाणी बचत होईल. आतापर्यंत या तरुणांनी जवळपास दोन लाख नागरिकांना या चळवळीशी जोडून घेतले आहे. चार महिन्यांतल्या या प्रयत्नांमुळे १ लाख ३२हजार ५५६ घनमीटर पाण्याची बचत झाली असून ते पाणी ५१ ऑलिम्पिक-आकाराच्या जलतरण तलावांच्या समतुल्य आहे. जलसंधारणाची मोठी चळवळ उभारण्याची ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातील १ हजार ४०० ग्रीन क्लबमधील ४०हजार युवा स्वयंसेवकांचे जलसंवर्धनसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी अभिनंदन करून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांना या चळवळीत सामील होण्याचे आवाहनही केले.
प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले की, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील १३ निवडक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात (उच्च व तंत्र शिक्षण) शिकत असलेल्या युवक/युवतींची वातावरण, हवामान बदल आणि पाणी बचत याविषयी माहिती वृद्धिंगत करणे, कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणे घेणे, शैक्षणिक संस्थास्तरावर ग्रीन क्लब ची स्थापना करणे, पाणी बचतीच्या उपाययोजना राबविणे, इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रातील १३ पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील १९०० महाविद्यालयांमध्ये ग्रीन क्लब स्थापन करणे, तरुणांमध्ये विविध पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणेहे उपक्रम आहेत. युथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शन, महा युथ फॉर क्लायमेट ॲक्शन (MYCA) प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन स्वयं-गती अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी ४८हजारहून अधिक नोंदणी झाली असून हवामान बदलाच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी तो खुला आहे: https://www.mahayouthnet.in/ राज्यभरात २३हजार ६७५ जणांनी हवामान बदलाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.अशी माहिती श्री. रस्तोगी यांनी दिली.
उच्च शिक्षण संचालक म्हणाले, डॉ. देवळाणकर म्हणाले, युवकांच्या (youth) सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या अभियान संदर्भातील महाविद्यालयांच्या प्रतिसादाबद्दल माहिती दिली..अनेक महाविद्यालयांमधून अभियानासंबंधी विद्यार्थ्यांकडून खूप सकारात्मक अभिप्राय मिळाला आहे आणि अधिक विद्यार्थ्यांना पर्यावरण क्षेत्रात सहभागी होण्यासाठी व ऑनलाईन सेल्फ-पेस्ड कोर्स अभ्यासक्रम क्रेडिट म्हणून सुरु करण्यास उपयोगी आहे. या कार्यक्रमासह YEWS अभियान अंतर्गत जागतिक जल दिन २०२४ साजरा करण्यास सुरुवात करत आहोत.
व्हाय वेस्ट वाईडव्ब्ल्यूएस ॲपविषयी माहिती
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ महाराष्ट्र, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया, ॲक्वाडॅम (ACWADAM) पुणे यांच्या सहकार्याने वाय वेस्ट वाईडव्ब्ल्यूएस ॲप (युथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टीवर्डशिप) तयार केले आहे. त्यामध्ये ७,लाख १०हजार तरुणांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
तरुणांसाठी एक व्यासपीठ बनवून त्यामाध्यामतून त्यांना जलसंधारणाची आवड निर्माण व्हावी हा यामगचा प्रयत्न आहे. हे ॲप दैनंदिन पाणी-बचतीची नोंद ठेवण्यासाठी एक साधन असून पाणी गळती दुरुस्त करणे, नळाचा प्रवाह कमी करणे, शॉवर एवजी बादलीने पाणी वापरणे, दात घासताना किंवा दाढी करताना पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे, ग्रामीण भागात शोष खड्डे व पाझर खड्डे बनविण्यास प्रवृत्त करणे अशा छोट्या छोट्या सवयींसाठी प्रोत्साहित करते.
