चंद्रपूर 19 ऑक्टोबर – ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील १७ नगर परिषद – पंचायत व १७ मनपा प्रभाग क्षेत्रातून संकलित केलेली माती अमृत कलश यात्रेद्वारे महापालिका हुतात्मा स्मारकात वाजतगाजत आणून मुख्यालय स्तरावर अमृत कलशांचे एकत्रीकरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील १७ नगर परिषद – नगर पंचायत यांच्या कलशातील माती जिल्हाधिकारी यांच्याकडे तर चंद्रपूर मनपा हद्दीतील १७ प्रभागातील कलशातील माती प्रतीकात्मक स्वरूपात आयुक्त विपीन पालीवाल यांच्याकडे देण्यात आली. नंतर सर्व कलशातील माती एकत्र करून १७ नगर परिषद / नगर पंचायत यांचा १ तर चंद्रपूर मनपाचा १ कलश तयार करण्यात आला. हे दोन्ही कलश कलश २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात नेण्यात येणार असून तदनंतर शासनाच्या माध्यमातून ०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात नेण्यात येणार आहे.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे यशस्वी नियोजन करीत ‘वसुधा वंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रण शपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान’ असे नानाविध उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यात अमृत कलशाची उत्सवी स्वरुपात यात्रा काढून विभागांतील घरोघरी जाऊन या कलशांमध्ये घराघरांतील, विभागीय परिसरातील माती संकलित करण्यात आली.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या अमृत कलश एकत्रीकरण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा,आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले यांच्याद्वारे उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली तसेच मनपा शालेय विद्यार्थ्यांतर्फे देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, जिल्हा सह आयुक्त अजितकुमार डोके,बल्लारपुर नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ,सर्व नगर परिषद – नगर पंचायत यांचे मुख्याधिकारी,शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य,विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
