नागपूर, 20 डिसेंबर (हिं.स.) – नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. याच्या निषेधार्थ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. याप्रसंगी काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनिल देशमुख, शिवसेनेचे राजन साळवी आदी विरोधी पक्षांतील आमदार उपस्थित होते.
आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली. ते म्हणाले, संसदेत खासदारांचे निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या सर्व योजना या फसव्या आहेत. हिवाळी अधिवेशनाकडे राज्यातील शेतकरी, सर्व सामन्याचे डोळे लागले होते, मात्र, या सरकारने सामान्य जनतेची , शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे अशी खरमरीत टीका करत श्री वड्डेटीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले.
विधिमंडळ परिसरात विरोधक विविध प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत कापूस सोयाबीन भाव दिला का ? नाही, नाही, नाही. भाताला भाव मिळाला का?नाही, नाही, नाही, धानाला भाव मिळाला का ? नाही, नाही, नाही असं म्हणत सगळ्या घटकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
हिंदुस्थान समाचार
