नवी दिल्ली / मुंबई, १५ ऑक्टोबर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली आहे
ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे, अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू आहे. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. २० पैकी १४ जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. सहा जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
