गंगटोक, 8 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार सिक्किमच्या जनतेबरोबर एकजुटीने उभे आहे आणि या सरकारने राज्यातली स्थिती पूर्ववत करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. हिम तलाव पूर (Glacier Lake outburst flood) ढगफुटी आणि अचानक आलेला पूर हे संकट ओढवल्यावर एका दिवसाच्या आत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना सिक्कीम दौरा करण्यासाठी नियुक्त केले.
राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा शुक्रवारी रात्री गंगटोक इथे पोहोचले आणि शनिवारी त्यांनी गंगटोकचे मुख्य सचिव आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागाचे प्रमुख तसेच सैन्यदल, भारत तिबेट सीमा पोलीस, सीमा रस्ते संघटना, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ, राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
भारत सरकार सिक्कीमच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि राज्याला सर्व आवश्यक मदत पुरवली जात असल्याचे अजय कुमार मिश्रा यांनी या बैठकीला संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज तसेच बचाव आणि मदत कार्यासंबंधी माहिती घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कायम संपर्कात आहेत.
भारत सरकारने एका अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये भारत सरकारच्या पाच मंत्रालयाचे म्हणजेच कृषी, राज्य परिवहन आणि महामार्ग, जलशक्ती, ऊर्जा आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ वास्तव स्थिती, नुकसानीचा अंदाज घेणे आणि आवश्यक असेल तिथे मदत पोहोचवण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
