मुंबई, 30 नोव्हेंबर (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार कामकाज करीत आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकार वर अत्यंत चुकीचे खोडसाळ आरोप करीत आहे. काँग्रेसचे नेते हे संविधान वाचवले पाहिजे, असा कांगावा करीत आहेत ते केवळ त्यांचा पक्ष वाचविण्यासाठी. प्रत्यक्षात संविधानाला कोणताही धोका नाही. भारतीय संविधानाचा गौरव करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून संविधानानुसार ते सरकारचा कारभार चांगला चालवत आहेत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
बांद्रा सिद्धार्थ कॉलनी येथे रिपाइं रोजगार आघाडीचे राज्य सरचिटणीस अमित तांबे यांनी आयोजित केलेल्या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, आयोजक रिपाई रोजगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अमित तांबे, संजय खंडागळे, युवराज सावंत, जिल्हाध्यक्ष साधु कटके, सचिन कासारे; आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. हे संविधान भारतीय लोकशाहीचे प्राण ठरले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी राजकारणामध्ये जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन पक्ष आम्हाला दिला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही कायम चालु ठेवु. आणि राजकीय पटलावर रिपब्लिकन पक्षाला जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचे काम मी करेन. असा ठाम निर्धार आठवले यांनी यावेळी केला.
हिंदुस्थान समाचार
