थंडीची लाट वाढण्याची वर्तवली शक्यता
नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.) : देशाच्या अनेक भागात येत्या 48 तासात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण भारतासह, महाराष्ट्र, दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरात पाऊस पडणार असून येत्या काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम असतानाच दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यामध्ये पुढील 48 तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले होते.
तर दिल्लीच्या काही भागांमध्ये शुक्रवारी सकाळी दाट धुके पडले होते. हवामान विभागाने आज, शनिवारी देखील दिल्लीत काही ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता असून थंड वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पहाटे पंजाब आणि दिल्लीच्या एकाकी भागात खूप दाट धुके दिसले. दरम्यान दक्षिण भारतासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. कन्नड, उडुपी, कोडागु आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात शनिवारी आणि रविवारी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील नागपूर आणि सभोवतालच्या भागात शनिवारी ढगाळ वातावरण होते.
हिंदुस्थान समाचार
