नवी दिल्ली , 16 डिसेंबर (हिं.स.)।भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) पाकिस्तानने शांतता आणि सलोख्याचा उल्लेख करत जम्मू–काश्मीरवर दावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळीही पाकिस्तानला अपयश आले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी ठाम शब्दांत सांगितले, “जम्मू–काश्मीर आणि लडाख ही केंद्रशासित प्रदेशे भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहेत. ती पूर्वीही भारताचाच भाग होती आणि कायम राहतील.”
भारताने संयुक्त राष्ट्रात केवळ सिंधू जल करार स्थगित करण्यामागचे कारण स्पष्ट केले नाही, तर पाकिस्तानला जागतिक दहशतवादाचे केंद्र असल्याचेही ठामपणे सांगितले. हरीश पर्वतनेनी म्हणाले, “भारत गेल्या 65 वर्षांपासून मैत्री आणि सद्भावनेपोटी सिंधू जल कराराचे पालन करत होता. मात्र या काळात पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे लादली, हजारो दहशतवादी हल्ले घडवून आणले आणि कराराच्या मूळ भावनेचे उल्लंघन केले.”
पाकिस्तानच्या भ्याड कृत्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पुढे सांगितले की पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांमध्ये हजारो भारतीयांचा बळी गेला आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू–काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका परदेशी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता.यावेळी सिंधू जल कराराबाबत भारताने स्पष्ट केले, “जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानसोबत हा करार स्थगित ठेवण्याची घोषणा भारताने केली आहे. जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीत फोफावलेला दहशतवाद पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.”
संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला आरसा दाखवताना भारताने पुढे म्हटले, “पाकिस्तानने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबले आहे. त्यांच्या पक्षावर – पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) – बंदी घालण्यात आली आहे आणि 27व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून लष्करप्रमुख आसीम मुनीर यांना आजीवन प्रतिरक्षा देण्यात आली आहे. हे प्रत्यक्षात एका प्रकारचे घटनात्मक उठाव (कू) आहे.”
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
