रत्नागिरी, 20 फेब्रुवारी : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक आहेत, असे मार्गदर्शन रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे या महिन्यात संवादमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. चांदणे बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणा साधत विद्यार्थ्यांना आवडेल अशा भाषण शैलीत, वातावरण खेळी मेळीचे ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे कार्यक्रम झाला. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज वाचन केले पाहिजेच. वाचनाने माणूस समृद्ध होतो. मुले आळस झटकून देऊन याच वयात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी साध्य करू शकतात. जितकी मेहनत घ्याल, त्याचे फळ निश्चितच तुम्हाला मिळेल. त्यासाठी प्रयत्न करत राहा, प्रयत्न सोडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
चांदणे मूळचे धाराशिव येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यांना वाचनाची मुळातच आवड असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी बरीच पुस्तके वाचून काढली. स्पर्धा परीक्षांचे ध्येय महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ठरवलेले असल्यामुळे ध्येयपूर्तीसाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली आणि वयाच्या चोविसाव्या वर्षी ते नोकरीत रुजू झाले.मुलांना त्यांचे मार्गदर्शन इतके भावले की कार्यक्रम संपल्यानंतरदेखील मुले बराच वेळ आपल्या जागेवरून हलली नाहीत, हे निव्वळ चांगल्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले. अकादमीतर्फे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी चांदणे यांचा सन्मान केला.
अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे गेल्या महिन्यापासून संवादमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या महिन्यातील हा संवादमालेचा दुसरा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला एस. बी. कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशीष बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सोनाली खेडेकर- मोरे यांनी केले.
