डेहरादून, 8 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय परिषदांची भूमिका केवळ सल्लागार म्हणून मर्यादित न राहता, कृतीशील मंच म्हणून अधिक उपयुक्त सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केले. उत्तराखंडच्या नरेंद्र नगर इथे आयोजित मध्य क्षेत्रीय परिषदेच्या 24 व्या बैठकीत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच, सहकारी संघराज्य भावनेला मजबूत करण्यावर भर दिला. आणि त्या अंतर्गत, क्षेत्रीय परिषदांमध्ये समस्यांचे निराकरण करणे, वित्तीय समावेशन वाढवणे आणि धोरणात्मक बदलांना अधिक गती देण्याची भूमिका या परिषदांनी पार पाडली आहे. मध्य क्षेत्रीय परिषदेतील राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम इंडियाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे, असेही शाह यावेळी म्हणाले.
देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकार करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून आता शेतकऱ्यांकडील, डाळी, तेलबिया आणि मका या उत्पादनांची 100 टक्के खरेदी, नाफेडद्वारे किमान हमी भावावर केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
2004 ते 2014 या कालावधीत क्षेत्रीय परिषदांच्या 11 बैठका आणि स्थायी समित्यांच्या 14 बैठका, तर 2014 ते 2023 या कालावधीत क्षेत्रीय परिषदांच्या 25 आणि स्थायी समित्यांच्या 29 बैठका झाल्या, असे शाह यांनी सांगितले. 2004 ते 2014 या कालावधीत एकूण 570 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्यापैकी 448 सोडविण्यात आले, तर 2014 ते 2023 या कालावधीत एकूण 1,315 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्यापैकी 1,157 प्रश्नांचे निराकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
