* वनडेतील ५५ वे, आंतरराष्ट्रीयतील १०० वे अर्धशतक पूर्ण
* सौरव गांगुलीच्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत
* एबी डीविलियर्सचा विक्रमही मोडीत
* सलग दोन विश्वचषक स्पर्धेत ५००हून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज
मुंबई, १२ नोव्हेंबर : नेदरलँड्स विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील ५५ वे, तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे १०० वे अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय यंदाच्या वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय रोहितने विराट कोहली आणि सौरव गांगुली या माजी कर्णधारांचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्याने विश्वचषकात ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. भारताच्या क्रिकेट इतिहासात सोनेरी अध्याय लिहित विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार असताना एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम याआधी सौरव गांगुलीच्या नावावर होता. २००३ च्या विश्वचषकात सौरव गांगुलीने तीन शतकांच्या मदतीने ४६५ धावा चोपल्या होत्या. २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या विश्वचषकात विराट कोहलीने पाच अर्धशतकाच्या मदतीने ४४३ धावा केल्या होत्या. सौरव आणि विराट यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत विश्वचषकात ४०० धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. रोहित शर्माने हा विक्रम मोडला आहे.
एका वर्षात सर्वाधिक षटकार
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डीविलियर्सने २०१५ मध्ये एकदिवसीय सामन्यात एका वर्षात ५८ षटकार मारले होते. हा विक्रम गेल्या सात वर्षांपासून अबाधित होता. आता रोहित शर्माने हा विक्रम मोडला आहे. नेदरलँड्स विरुद्ध रोहितने आपल्या डावातील पहिला षटकार ठोकताच डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला.
विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार
रोहितने आणखी एक विशेष विक्रमही आपल्या नावावर केला. कर्णधार म्हणून तो विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला. त्याच्या आधी हा विक्रम इऑन मॉर्गनच्या नावावर होता. मॉर्गनने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत २२ षटकार मारले होते.
एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहित शर्मा – ५०३ धावा, सौरव गांगुली – ४६५ धावा (२००३), विराट कोहली – ४४३ धावा (२०१९), मोहम्मद अझरुद्दीन – ३३२ धावा (१९९२), कपिल देव – ३०३ धावा (१९८३) यांचा समावेश आहे.
सलग दोन विश्वचषक स्पर्धेत ५००हून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज
गांगुलीचा विक्रम मागे टाकताना रोहितने भारताच्या आणखी एका दिग्गज खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी केली. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५००हून अधिक धावा करण्याची रोहितची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०१९ मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती. आता या पुन्हा त्याने ५००हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी फक्त सचिन तेंडुलकरने केली होती. सचिनने १९९६ आणि २००३ मध्ये दोन वेळा ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. इतकचं नाही तर रोहित हा जगातील पहिला फलंदाज आहे, ज्याने सलग दोन विश्वचषक स्पर्धेत ५००हून अधिक धावा केल्या.
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीचा खेळाडू म्हणून १४ हजार धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. त्याने नेदरलँड्स विरुद्ध तिसऱ्या षटकांत १२ वी धाव पूर्ण करताच हा महारेकॉर्ड आपल्या नावावर केला. तसेच भारतीय संघासाठी सलामीचा खेळाडू म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम याआधी वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने भारतासाठी एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी या तिन्ही प्रकारांत मिळून एकूण १५,७५८ धावा केल्या आहेत. त्या खालोखाल सचिन तेंडुलकर १५,३३५,, रोहित शर्मा १४,०४७, सुनील गावसकर १२,२५८ आणि शिखर धवन १०,८६७ धावा.
