नवी दिल्ली, 31 जानेवारी (हिं.स.)भारतीय हॉकी संघातून वगळण्याबाबत सुरू असलेल्या अटकळींवर माजी कर्णधार मनप्रीत सिंगने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, तो कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईमुळे नव्हे तर आराम करण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी स्वेच्छेने संघ सोडत आहे. दोन वेळा ऑलिंपिक कांस्यपदक विजेता मनप्रीत सिंगला १५ वर्षांत पहिल्यांदाच ३३ संभाव्य खेळाडूंच्या कोअर ग्रुपमधून वगळण्यात आल्यानंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
गेल्या डिसेंबरमध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आपल्या सहकाऱ्याला औषधी च्युइंगम खायला दिल्याच्या आरोपाखाली मनप्रीतला संघातून वगळण्यात आल्याच्या वृत्तानंतर ही घटना घडली. पण मनप्रीतने सोशल मीडियावरील या चर्चांना उत्तर देताना म्हटले आहे की, व्यस्त वेळापत्रकानंतर त्याला अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मनप्रीतने ‘एक्स’ वर लिहिले आहे की पॅरिस ऑलिंपिकपासून हॉकी त्याच्यासाठी अविरत आहे. गेल्या वर्षभरात त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांचाही उल्लेख केला. त्याने लिहिले, गेल्या वर्षी, माझी पत्नी एली आणि मला आमची दुसरी मुलगी झाली. सलग दोन शिबिरे आणि स्पर्धांमुळे, मी माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकलो नाही.
या विश्रांतीबद्दल त्याने स्पष्ट केले की हॉकी इंडिया लीगनंतर झालेल्या संभाषणानंतर त्याला हा ब्रेक मिळाला. त्याने लिहिले, माझ्या संघाने, रांची रॉयल्सने अंतिम सामना खेळला तेव्हा, प्रशिक्षकाने माझ्याशी बोलले आणि मला ही अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती देण्याचा त्यांचा निर्णय कळवला. ३३ वर्षीय मिडफिल्डरने सांगितले की हा ब्रेक त्याला आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये परतण्यापूर्वी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बरा होण्यास मदत करेल. त्याने लिहिले, या लहान विश्रांतीमुळे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे मला मानसिकरित्या रिचार्ज होण्यास आणि संघासाठी अधिक मजबूत परत येण्यास मदत होईल. तो पुढे म्हणाला, मला हा छोटा ब्रेक दिल्याबद्दल मी हॉकी इंडिया आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो आणि मी भारतीय संघाला त्यांच्या प्रो लीगसाठी शुभेच्छा देतो.
हॉकी इंडियाने संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली होती. आणि या यादिमध्ये फॉरवर्ड दिलप्रीत सिंग आणि गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक यांनाही वगळण्यात आले. आगामी FIH प्रो लीग हंगाम पुढील महिन्यात सुरू होत आहे. भारताचा टप्पा १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारताचा पहिला सामना ११ फेब्रुवारी रोजी अर्जेंटिनाशी होईल. मनप्रीतने अलीकडेच हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीत रांची रॉयल्सचे सह-कर्णधारपद भूषवले आणि त्याच्या कामगिरीबद्दल त्याने कौतुकाची थाप मिळवली. दिलीप तिर्कीच्या ४१२ सामन्यांच्या दीर्घकाळाच्या भारतीय विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो फक्त एका आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अंतरावर आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
