वाशिम, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
गावोगावी सक्षम आरोग्य सुविधा पोहोचवणे ही आरोग्य विभागाचे प्रार्थमक्रम आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ उपचारासाठी नसून प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम, जनजागृती आणि वेळेवर निदानासाठीही महत्त्वाची ठरतात. पुढील काळातही आरोग्य सुविधांना बळकटीकरणासाठी गती दिल्या जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
रिसोड तालुक्यातील रिठद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, गोरगरीब व गरजूंना वेळेवर उपचार मिळणे हीच खरी आरोग्य व्यवस्थेची कास आहे. रुग्णांची सेवा करून समाधान मिळते, आणि यासाठीच गावोगावी सक्षम आरोग्य सुविधा पोहोचवण्यास शासन कटिबद्ध आहे. रिठद येथील नव्या इमारती व 10 उपप्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे ग्रामीण जनतेला तातडीची, दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. कोवीड काळात आरोग्य यंत्रणेची कामगिरी उल्लेखनिय होती. पुढील काळातही आपातकालीन परिस्थितीसाठी सज्ज राहून सामान्य नागरिकापर्यंत सेवा देऊ, असे ते यावेळी म्हणाले.
ऑनलाईन लोकार्पणामध्ये वाशिम तालुक्यातील शेलू बु, वारा जहाँगीर, कळंबा महाली, पिंपळगाव, रिसोड तालुक्यातील चिचंबाभर, भौरद, मानोरा तालुक्यातील फुलउमरी, मंगरूळपीर तालुक्यातील पोटी, कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगीर,धनज खूर्द या उपकेंद्राचा समावेश आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर, प्रयोगशाळा सेवा आणि रुग्णांसाठी स्वच्छ, सुसज्ज इमारतीचे महत्त्व यावर भाष्य केले. नव्या इमारतीमुळे रुग्णांना गावातच वेळेवर उपचार, तातडीची वैद्यकीय मदत आणि विविध आरोग्य उपक्रमांचा लाभ मिळणार आहे. तसेच नव्याने सुरू झालेल्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता व पोहोच दोन्ही वाढण्याची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केल्या. त्यानंतर पालकमंत्री भरणे व मान्यवरांनी इमारतीचे पाहणी केली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने
