अमरावती, 1 नोव्हेंबर, (हिं.स.) – संपूर्ण राज्यातून मराठा आरक्षणाचे एकच वादंग निर्माण झाले असुन महाराष्ट्रभर वणव्यासारखं वातावरण तयार होतांना दिसून येत आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत आज संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष समाजसेवी नितीन कदम यांनी सहक-यासोबत एक दिवसीय उपोषण करून शासनविरोधी आपल्या समाजाची वेदना मांडणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बिघडत चाललेल्या परिस्थितीला संपूर्णपणे शासन जबाबदार असल्याचा रोष यावेळी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील सर्व समाजाच्या जाहीर पाठींब्याकरता व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाई साठी येत्या 3 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता रोजी पंचवटी चौकातील भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन सकल मराठा समन्वय समिती यांनी केले आहे. सदर शांतीप्रिय मोर्चाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी सकल मराठा समाातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
