उत्तर-चोवीस परगणा जिल्ह्यातील घटना
कोलकाता, 05 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये छापेमारी करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर आज, शुक्रवारी सकाळी हल्ल्याची घटना घडली. राज्यातील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई करीत असताना ईडीच्या पथकाला या हल्ल्याचा सामना करावा लागला.
यासंदर्भातील माहितीनुसार पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या रेशन घोटाळ्या प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज, शुक्रवारी सकाळपासून ईडीचे अधिकारी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख व शंकर आद्या यांच्या घरी तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आणि कार्यालयात झाडाझडती घेत होते. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही अधिकाऱ्यांसोबत होते. सुरुवातीला काही ठिकाणी झाडाझडती घेतल्यानंतर ईडीचं एक पथक शाहजहान शेख यांच्या घरी पोहोचले. तिथं त्यांनी शेख यांना फोन केला. मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही, तेव्हा अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
झाडाझडतीसाठी घरात प्रवेश करण्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतानाच काही महिलांसह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी अधिकाऱ्यांवरही हल्ला केला आणि एका वाहनाचे नुकसान केले. हिंसक जमावाच्ये भीतीने ईडीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून पळ काढावा लागला. याच जिल्ह्यात आद्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या रेशन घोटाळ्यात राज्यातील एक मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना आधीच अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी हे कृत्य केल्याचा आरोप अधीररंजन यांनी आहे. पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्था राहिली नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. ‘ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापुढे पुरेशी सुरक्षा व्यवस्था घेऊन कारवाई करायला हवी. आज अधिकारी जखमी झाले आहेत, उद्या त्यांचा खूनही होऊ शकतो, अशी भीती चौधरी यांनी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार
