डेहराडून, 9 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तराखंडची भूमी ही शूरांची भूमी आहे. या राज्यातील तरुणांना भारतीय सशस्त्र दलात सामील होऊन भारत मातेचे रक्षण करण्यात अभिमान वाटतो. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलची ही उत्कट भावना प्रत्येक नागरिकासाठी अनुकरणीय असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. आज (9 नोव्हेंबर) डेहराडून येथे उत्तराखंड राज्य स्थापना दिन समारंभात प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
भारतीय सैन्याच्या दोन रेजिमेंट – कुमाऊं रेजिमेंट आणि गढवाल रेजिमेंट – यांना उत्तराखंडच्या प्रदेशांची नावे देण्यात आली आहेत. यातून उत्तराखंडची शौर्य परंपरा अधोरेखित होते. त्या म्हणाल्या की, एका नवीन ओळखीसह उत्तराखंडचे कष्टकरी लोक विकास आणि प्रगतीची नवी उंची गाठत आहेत ही आनंदाची बाब आहे.
राष्ट्रपतींनी नमूद केले की उत्तराखंडची भारतातील इतर राज्यांबरोबर भौतिक आणि डिजिटल जोडणी सतत वाढत आहे. येथे पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. आपत्ती व्यवस्थापनावरही सरकार विशेष लक्ष देत आहे. त्यांनी सांगितले की उत्तराखंडमधील बहुआयामी प्रगतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये या राज्याविषयी उत्साह वाढला आहे.
उत्तराखंडच्या विकासात सरकार पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींवर भर देत याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. सकल पर्यावरण उत्पादनाचा (जीईपी) अंदाज लावण्याच्या राज्य सरकारच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेल्या या राज्यात राज्याच्या दरडोई उत्पन्नावर तसेच राज्य जीईपीवर लक्ष केंद्रित केल्याने शाश्वत विकासाला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
