नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : केंद्र सरकार राबवत असलेल्या योजना मोदींच्या नसून देशाच्या आहेत. परंतु, काँग्रेसकडून प्रत्येक योजनेला विरोध केला जातो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते आज, सोमवारी लोकसभेत बोलत होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसमध्ये अनेकांनी निवडणूक लढवण्याचे धैर्य देखील गमावले आहे. अनेकजण लोकसभेऐवजी राज्यसभेत जाऊ इच्छित आहेत. काँग्रेस पक्षातील अनेक लोक मतदारसंघ देखील बदलणार आहेत. देशातील 4 स्तंभ जेवढे मजबूत असतील तेवढ्याच गतीने देशाचा विकास होईल. देशातील स्त्रीयांची आणि तरुणांच्या शक्तीचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला आहे. कधीपर्यंत देशाचे तुकडे करीत राहणार आहात ? असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला. अनेकदा सकारात्मक सूचना येतात. मात्र, काँग्रेसने सर्वांना नाराज केले आहे. नेते बदलेले आहेत, मात्र टेप रेकॉर्डर तोच आहे. निवडणूकीचे वर्ष आहे, थोडी मेहनत करायला हवी होती. त्यामध्ये देखील हे नापास झाले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत हे प्रेक्षक म्हणून पाहायला मिळतील, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विरोधी पक्षाच्या स्थितीला काँग्रसचं जबाबदार असल्याचेही मोदी म्हणाले.
काँग्रेस गेल्या 10 वर्षांत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरली आहे. शिवाय इतर पक्षांना आणि नेत्यांना देखील संधी मिळू नये, याची काँग्रेसने काळजी घेतली. काँग्रेसच्या क्षमतेवर मला दया येते. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. देशाचे घराणेशाहीमुळे मोठी नुकसान झाले. पक्षाचे सारे निर्णय जेव्हा एका कुटुंबाकडून घेतले जातात त्याला घराणेशाही म्हटले जाते. घराणेशाहीमुळे काँग्रेसचेही नुकसान झाले आहे. मल्लिकार्जुन खरगे दुसऱ्या सभागृहात शिफ्ट झाले तर गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला. कोणत्या परिवाराने लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर राजकीय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केलय. अशा कुटुंबाच्या घराणेशाहीला कधीच विरोध केला नाही. मात्र, काँग्रेस पक्षात एकाच कुटुंबाच्या इशारावर निर्णय घेतले जातात, त्या घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
