* बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, शेतक-यांना तातडीने मदत देणार
* सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, आणि मूग पिकांचं नुकसान. तर, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका
मुंबई, 5 सप्टेंबर (हिं.स.) – महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये १५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर, वाशीम – १,६४,५५७ हेक्टर, यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर, धाराशिव – १५०,७५३, बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर, अकोला – ४३,८२८ हेक्टर, सोलापूर – ४७,२६६ हेक्टर, हिंगोली – ४०,००० हेक्टर
बाधित पिके – सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
एकूण बाधित जिल्हे : नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
