नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। भारत मंडपम येथे सुरू असलेल्या एआय शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने शनिवारी काँग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. भाजपने काँग्रेसच्या आंदोलनाची निंदा करत हे देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि इतर काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष सचदेवा, माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार भाटिया, विष्णु मित्तल, प्रवीण शंकर कपूर, उपमहापौर जयभगवान यादव, जिलाध्यक्ष वीरेन्द्र बब्बर, माया विष्ट आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष सचदेवा आणि इतर कार्यकर्त्यांना तुगलक रोड येथील पोलिस ठाण्यात नेले. सुमारे एका तासानंतर त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष सचदेवा यांनी सांगितले की, एआय शिखर परिषद ही भाजपची नव्हे तर भारत राष्ट्राचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये घुसून आंदोलन करणे म्हणजे थेट राष्ट्रद्रोह आहे. त्यांनी म्हटले की, एआय शिखर परिषदेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर, जिथे भारत आपली नवोन्मेष क्षमता, स्टार्टअप परिसंस्था आणि डिजिटल क्रांतीचे प्रदर्शन करत आहे, तिथे अशा प्रकारचे आंदोलन काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाचे द्योतक आहे.
सचदेवा म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जग भारताची तांत्रिक प्रगती आणि डिजिटल नेतृत्व मान्य करत आहे, अशा वेळी काँग्रेसकडून अशा प्रकारचा गोंधळ घालणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी आरोप केला की, काँग्रेस देशहितापेक्षा स्वतःची राजकीय निराशा वरचढ ठेवत आहे आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरही भारताच्या कामगिरीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे.
काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधताना सचदेवा म्हणाले की, ही तीच मानसिकता आहे जी संसद ते रस्त्यांपर्यंत देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आली आहे. भारत आज तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचत आहे, मात्र काँग्रेसला हे पचत नाही.
खासदार मनोज तिवारी म्हणाले की, शुक्रवारी घडलेली घटना ही सामान्य नव्हती. पोलिस काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडण्यापूर्वीच तेथे उपस्थित जनतेने त्यांना धडा शिकवला. एआय शिखर परिषदेत काँग्रेसचे हे आंदोलन राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या हताशेचे प्रतीक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
