काबुल , 22 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तानवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात किमान 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अफगाणी माध्यमे आणि सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. या एअर स्ट्राइकनंतर अफगाणिस्तानात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अफगाणिस्तानने महिलां-मुलांच्या हत्येचा आरोप करत पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान (तालिबान सरकार) चे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानने नंगरहार आणि पक्तिका प्रांतांवर केलेल्या हवाई हल्ल्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानातील जनरल आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षा कमकुवतपणा लपवण्यासाठी महिलां आणि मुलांना लक्ष्य करत आहेत. मुजाहिद यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “पाकिस्तानी जनरल आपल्या देशातील सुरक्षा त्रुटींची भरपाई अशा गुन्ह्यांद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
अफगाणिस्तानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सैन्याने अफगाण हद्दीत घुसखोरी करून नागरिकांवर हल्ला केला. नंगरहार प्रांतातील बेहसूद जिल्ह्यातील एका नागरिकाच्या घराला लक्ष्य करण्यात आले, जिथे एकाच कुटुंबातील 23 सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले. मृतांमध्ये किमान 12 लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. नंगरहार आणि पक्तिका प्रांतांत एकूण डझनावारी नागरिक ठार आणि जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पक्तिका प्रांतातील बेरमाल येथे असलेल्या एका धार्मिक मदरशालाही या हल्ल्यात फटका बसल्याची माहिती आहे.
दरम्यान पाकिस्तानने या हल्ल्यांची कबुली दिली असून ते “गुप्त माहितीवर आधारित निवडक कारवाई” असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या कारवायांमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक राज्य – खोरासान प्रांत (आयएसकेपी) यांच्या सात ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले अफगाणिस्तानातून कार्यरत दहशतवादी गटांवर केंद्रित होते, असा दावा पाकिस्तानने केला आहे.तर अफगाण संरक्षण मंत्रालयाने या कारवाईचा तीव्र निषेध करत हा अफगाण सार्वभौमत्वाचा उघड भंग असल्याचे म्हटले आहे. त्यांनी “योग्य वेळी मोजून मापून प्रत्युत्तर दिले जाईल” असा इशाराही दिला आहे.
हे हल्ले पाकिस्तानमध्ये अलीकडे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यात इस्लामाबादमधील शिया मशिदीवरील हल्ल्याचाही समावेश असून त्यात डझनावारी लोकांचा मृत्यू झाला होता.
ऑक्टोबर 2025 मधील सीमावादातील संघर्षानंतर, ज्यात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, दोन्ही देशांतील तणाव वाढलेला आहे. या ताज्या घटनेमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
