पुणे, 9 जानेवारी (हिं.स.) भारत फोर्ज लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय बाबासाहेब कल्याणी यांच्या द्रष्ट्या व सर्वसमावेशक मार्गदर्शनांतर्गत शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते आणि रोजगार या पाच महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे महाराष्ट्रातील सुमारे १०० गावांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे शिवधनुष्य सीएसआर विभाग यशस्वीपणे पेलत आहे.
भारत फोर्ज लिमिटेड ही फोर्जिंग आणि अन्य उत्पादन क्षेत्रांशी संबंधित एक अग्रगण्य उद्योगसंस्था असून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सरकारच्या सामाजिक विकास कार्याला गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे हातभार लावत आहे. समाजातील विविध घटकांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार कंपनीतर्फे सीएसआर उपक्रम राबवले जातात.
ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, औद्योगिक आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या या जागतिक उद्योग समूहांतर्गत स्थापित सीएसआर समिती सामाजिक विकासाच्या उद्देशाने विविध प्रकल्प राबवते. समाजातील तातडीच्या गरजा आणि शाश्वत विकासाचे दीर्घकालीन धोरण यांच्यामध्ये समतोल राखून कंपनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देत आहे.
शाश्वत व्यवसाय आणि सामाजिक सुधारणा
भारत फोर्ज ही सामाजिकदृष्ट्या जागरूक उद्योगसंस्था असून समाज आणि व्यवसाय या दोन्हींच्या वाढीसाठी शाश्वत व्यवसाय पद्धती अवलंबण्यावर तिचा भर असतो. कंपनीच्या सीएसआर धोरणात गावांचा विकास, वंचित मुलांसाठी शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण यांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम २०१३च्या कंपनी कायद्यातील सातव्या परिशिष्टाच्या चौकटीत येतात.
”आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून समाजाचे ऋण फेडण्याचे आमचे हे काम दरवर्षी नियमितपणे सुरू असते. या कामांची तपासणी आमच्या सीएसआर समितीचे अधिकारी करीत असतात व त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही आम्हाला मिळते,” असे भारत फोर्जच्या सीएसआर प्रमुख डॉ. लीना देशपांडे सांगतात.
गावांचा समग्र विकास : शाश्वत समाजासाठीचा एक दृष्टिकोन
शाश्वत विकास घडविणे आणि समाजातील विविध स्तरांतील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारणे, याकडे भारत फोर्ज लिमिटेड लक्ष देत आहे. या दृष्टीने महाराष्ट्रातील १०० गावांचे परिवर्तन आणि विकास घडविण्याच्या मोहिमेवर भारत फोर्जमधील सीएसआर गट काम करीत आहे. या गावांतील पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण सुधारणे, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, गावातील मुलामुलींचे शिक्षण, ग्राम आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, असे सर्वच प्रमुख मुद्दे भारत फोर्ज सक्षमपणे हाताळत आहे.
आर्थिक व्यवस्थापन : सीएसआर खर्चामध्ये उत्तरदायित्व सुनिश्चित करणे
‘भारत फोर्ज’च्या सीएसआर अहवालात नमूद करण्यात आलेल्या आर्थिक पारदर्शकतेमधून कंपनीची या संदर्भातील जबाबदारी व सामाजिक कामांसाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठीची बांधिलकी दिसून येते. विविध उपक्रमांसाठी आणि अतिरिक्त खर्चांसाठी निधीचे वाटप कसे केले आहे, याचा तपशील देऊन कंपनी आपल्या भागधारकांना सीएसआर उपक्रमांविषयी पारदर्शकपणे माहिती देते. खर्च न केलेल्या निधीचे हस्तांतरण ‘अखर्चित सीएसआर’ खात्यात केले जाते. त्यामुळे संसाधनांचा प्रभावी आणि कार्यक्षमतेने वापर केला जात असल्याची खातरजमा होते. सामाजिक विकासाचे प्रकल्प कार्यक्षमतेने राबविण्याचे कंपनीचे धोरण यातून स्पष्ट होते.
कोविड १९ साथीच्या काळातील कार्य : संकटग्रस्त समाजघटकांना मदत
कोविड-१९ साथीच्या काळात पुण्यातील भारत फोर्ज नामक फोर्जिंग उद्योगसमूहाने सामाजिक तसेच आर्थिक विघ्ने दूर करण्याच्या उद्देशाने संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविले. स्वच्छता पाळणे, सामाजिक अंतर राखणे आणि विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अवलंबणे यांबद्दल जागरूकता मोहिमादेखील राबवण्यात आ ल्या . उपयुक्त औषधांचा पुरवठा, वैद्यकीय उपकरणे व आरोग्य केंद्रात भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन शाश्वत स्वरूपाचे उपक्रम भारत फोर्जने पार पाडले.
शिक्षण आणि कौशल्य विकास यांना चालना
भारत फोर्जने ‘शिक्षण आणि कौशल्य विकास’ या मुद्द्यांना आपल्या सीएसआर धोरणात प्रमुख घटक म्हणून प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षी कंपनीने १३० झोपडपट्ट्यांमधील सुमारे १४ हजार मुलांच्या अनौपचारिक शिक्षणासाठी प्रयत्न केले. समाजातील या वंचित घटकांना किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध होईल, याची तजवीज यातून करण्यात आली.
याबाबत बोलताना सीएसआर प्रमुख डॉ. लीना देशपांडे म्हणाल्या, भारत फोर्जच्या सीएसआर मोहिमेंतर्गत आमचे प्रकल्प विविध क्षेत्रांमध्ये सुरू आहेत. समाजाचा सर्वसमावेशक विकास घडविण्याप्रति आमची कटिबद्धता यातून दिसून येते.
या व्यतिरिक्त, कंपनीने ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ (सीओई) आणि ‘इन्क्युबेशन सेंटर्स’ स्थापन केली आहेत. ‘आयओटी’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यांसारखी नवीन युगातील कौशल्ये प्रदान करण्यावर या सेंटर्समध्ये लक्ष केंद्रित केले जाते. या उपक्रमांद्वारे समाजाच्या शैक्षणिक गरजांसाठी योगदान देत असताना भारत फोर्जचा सीएसआर विभाग युवा पिढीला भविष्यातील आव्हाने आणि संधींसाठीही सक्षम करीत आहे.
आरोग्यसेवा आणि निरोगी जीवन
आरोग्य सेवा आणि निरोगी जीवन हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. कंपनीने अनेक टेलिमेडिसिन केंद्रे स्थापन केली असून याद्वारे अतिदुर्गम भागांतील नागरिकांना वैद्यकीय सल्ला आणि औषधे उपलब्ध केली जातात. याखेरीज, ग्रामीण भारताच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत फोर्जतर्फे अनेक आरोग्य शिबिरेही आयोजित केली जातात.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. विशेषत: कोविड साथीच्या काळात भारत फोर्जच्या या उपाययोजनांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. शिवाय, ग्रामीण भागांतील महिलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन ग्रामीण महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिरेही या काळात आयोजित करण्यात आली होती.
हिंदुस्थान समाचार
