* हिंदू विरोध हाच उद्देश !
आपल्या हिंदू विरोधी धोरणातून काँग्रेसने 22 जानेवारीला श्रीरामललाच्या पुनर्प्रतिष्ठापनेचे निमंत्रण नाकारले. सोबतच कधीही हिंदू संत महंतांना महत्व न देणाऱ्या काँग्रेसने सध्या चार शंकराचार्यांच्या नावाचा गैरवापर करून हिंदू समाजाच्या अभूतपूर्व उत्साहावर विरजण टाकण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.
काँग्रेसला दोन शंकराचार्यांनी आयते कोलीत दिले. त्या दोघांच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर फिरवून काँग्रेसने उर्वरित दोन शंकराचार्यांच्या नावाने देखील अपप्रचार चालवला आहे. या चारही शंकराचार्यांचा काँग्रेस सध्या आदरपूर्वक उल्लेख करते आहे. जामा मशिदीच्या शाही इमामाच्या फतव्यावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसला या दोन – चार दिवसात शंकराचार्यांचा फार पुळका आलेला आहे. काँग्रेसचा हा आदरभाव पाहता त्यांनी देशाला एक शब्द दिला पाहिजे. यापुढे कुठल्याही शंकराचार्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाला एवढ्याच आदराने काँग्रेस सन्मान देईल आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांचा शब्द खाली जाऊ देणार नाही, हे वचन काँग्रेसने देशाला दिले पाहिजे. काँग्रेसला सोयीचे असेल तर शंकराचार्यांविषयी आदर आणि हिंदू हिताचा विषय असेल तर शंकराचार्य धर्मांध, असे चालणार नाही. जेव्हा काही शंकाराचार्य श्रीरामजन्मभूमी मुक्त करा म्हणून मागणी करत होते, तेव्हा काँग्रेसला शंकराचार्य पूजनीय नव्हते का ? ज्या शंकराचार्यांचा काँग्रेस सध्या उदो उदो करते आहे, त्यांनी यापूर्वी केलेल्या महत्वपूर्ण मागणीलाही काँग्रेसने आपले समर्थन जाहिर करावे. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झालेली असल्याने सर्व मुसलमानांना पाकिस्थानात पाठवायला हवे, हे त्यांचेच विधान आहे. काँग्रेसने या विधानाविषयी देखील स्वतःचे धोरण देशाला सांगितले पाहिजे.
एरवी हिंदूंची प्रतारणा करणाऱ्या काँग्रेसला एकाएकी शंकराचार्य वंदनीय वाटतात, या मागे कुठली गोम आहे हे न समजण्याएवढा हिंदू समाज दुधखुळा नाही. मुळात दोन शंकराचार्यांनी 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमावर आक्षेप घेणारी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, उर्वरित दोन शंकराचार्यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. उलट कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामललाच्या पुनर्प्रतिष्ठापने बद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या दोघांच्या नावाने अपप्रचार केला जात आहे म्हणून त्यांनी लिखित स्वरूपात खुलासा देखील केला आहे. काँग्रेसला रामाबद्दल प्रेम नाही. उलट आकसच आहे. हिंदूंबद्दल तर कवडीचीही आस्था नाही. मग त्यांना एकाएकी दोन शंकराचार्य एवढे प्रिय का झाले, याचे उत्तर स्पष्ट आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या विरोधात लावलेला सूर काँग्रेसला प्रिय आहे. त्यामुळेच व्हॅटिगनचे आदेश पाळणारे एकाएकी शंकराचार्यांचा गवगवा करायला लागले आहेत.
एखाद दुसऱ्या शंकराचार्याने वेगळी भूमिका मांडणे काही नवे नाही. श्रीरामजन्मभूमी आंदोलन शिखरावर असताना देखील असे अपवाद जाणीवपूर्वक समोर आणले गेले होते. देशातील हिंदूंना एक गोष्ट समजते, श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी देशातील बहुतांश साधू, संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महंत, धर्मचार्य संघटित झाले आहेत. भाषा, पूजा पद्धती, संप्रदाय, पंथ असे भेद न बाळगता हे राष्ट्र मंदिर उभे करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अभूतपूर्व उत्साह आहे. यांच्यापैकी कोणाचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर आक्षेप नाही. मोदीजी हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या श्रीरामाचे भक्त आहेत. एकेकाळी देशाचे पंतप्रधान सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा नाकारत होते. आज निधड्या छातीचे पंतप्रधान श्रीरामललाच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी येणे, ही जगातील सर्व हिंदूंसाठी अभिमानाची बाब आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिराचा कार्यक्रम हा एकमताने ठरला आहे. मुळात एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हिंदू समाज विरोधात लागलेला कोणाचाही सूर ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. ‘अवध मे राम आये है’ म्हणत तो आपल्या घरी व गावात दिवाळी साजरी करण्याच्या कामी लागला आहे. हिंदू समाजासमोर एक चित्र स्पष्ट आहे. भारताला गुलामीत ठेवण्यासाठी हिंदू समाजातील ‘राम’ घालवण्याच्या मानसिकतेतून श्रीरामजन्मभूमी बळकावण्यात आली होती. ते गुलामगिरीचे चिन्ह पुसून शेकडो वर्षांची तपश्चर्या फळाला येते आहे. राम आणि राष्ट्र ही सांगड पक्की आहे. स्वाभिमानाची ही लढाई आहे. आत्मसन्मानाची लढाई आहे. आत्मसन्मान गमावलेला समाज समर्थ राष्ट्र घडवू शकत नाही. राष्ट्र समर्थ झाले तरच हिंदूंचा सन्मान, संत – महंतांचा सन्मान देखील कायम राहणार आहे. शास्त्रावर चर्चा करायची ही वेळ नाही. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाने देखील धर्माचे पालन करण्यासाठी वाली वध करताना शास्त्राचा विचार केला नव्हता. प्रभु श्रीरामाने रामेश्वरम येथे समुद्राच्या काठावर रेतीवर ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती. मंदिर बांधलेले नव्हते. पुढे मंदिर बांधले गेले तेव्हा ज्योतिर्लिंग तिथेच होते. काँग्रेसने ठोकलेल्या कुलुपात सळाखांच्या मागे रामललाने राहायचे. नंतर तंबूत राहायचे. पण अतिशय सुंदर तयार गर्भगृहात राहायचे नाही, हे शास्त्र आम्हाला शिकवू नका. श्रीरामाचे अस्तित्व नाकारणारे शंकराचार्यांचे आणि शास्त्राचे दाखले देत आहेत. काँग्रेसने शास्त्र सांगावे, या पेक्षा मोठा दैव दुर्विलास तो कोणता !
मोदीद्वेषाने पछाडलेली काँग्रेस चीनच्या मांडीवर जाऊन बसते. मोदींचा विरोध करता करता ते देशविरोधी व आता रामविरोधी भूमिका घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत, हा अनुभव आहे.
श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंनी त्र्याहत्तर वेळा शास्त्र नाही शस्त्र हातात घेतले. रामभक्तांनी आपल्या रक्ताने या श्रीरामजन्मभूमीचे सिंचन केले आहे. प्रचंड शारीरिक व मानसिक अत्याचार सहन केले आहेत. प्रचंड संघर्षातून हा ऐतिहासिक शुभ प्रसंग हिंदूंच्या जीवनात आलेला आहे. काँग्रेसला शंकराचार्यांविषयी उदभवलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे, हे त्या दोन मान्यवरांना कळत नाही हे मात्र, हिंदूंचे दुर्दैव आहे.
– शिवराय कुलकर्णी
9881717827
हिंदुस्थान समाचार
