* धारावीचे लोक जर मातोश्रीवर मोर्चा घेऊन गेले, तर आश्चर्य वाटणार नाही!
मुंबई, ७ डिसेंबर (हिं.स.) : उद्धव ठाकरे हे विकासविरोधी आहेत. राज्यातील मोठे प्रकल्प बंद पाडण्याचे काम, राज्याला मागे नेण्याचे काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने केलेले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यावर केली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. तसेच नाणार येथील अणुऊर्जा प्रकल्प, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि आरे मेट्रो कारशेड प्रकल्प बंद पाडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या अदानी कार्यालयावरील मोर्चावर बोलताना शिंदे म्हणाले, विकास करणाऱ्या उद्योजकांचा विरोध ठाकरे सतत करतात. सर्वांना माहीत आहे की देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या निवासस्थानाजवळ ज्या अधिकाऱ्याने स्फोटके सोडली, त्याला सेवेत कुणी घेतले.
धारावीच्या परिस्थितीवर बोलताना श्री शिंदे म्हणाले, धारावीच्या लोकांची परिस्थिती बिकट आणि दयनीय आहे. मागील 25 वर्षे धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रयत्नांना अपयश मिळाले. उद्धव ठाकरे हे गरीबविरोधी आहेत असा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले, धारावीत राहणाऱ्या गोरगरिबांना हक्काची घरे मिळू नयेत हाच उद्धव ठाकरेंचा प्रयत्न राहिलेला आहे. श्री शिंदे म्हणाले, मला आश्चर्य वाटणार नाही की धारावीचे लोक मातोश्रीवर उलटा मोर्चा नेतील. आज विदेशी पर्यटक धारावीची झोपडपट्टी बघायला येतात, भविष्यात ते धारावीचा विकास पाहायला येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
नंतर पत्रकारांशी बोलताना श्री शिंदे म्हणाले यांनी माहिती दिली की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे झोपडपट्टी मुक्त मुंबईचे स्वप्न ते धारावीचा विकास करून पूर्ण करणार आहेत. पाहिले एसआरए प्रोजेक्ट हे पहिल्या युती सरकारने मुंबईत राबवले याचा मला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
