
* भारताचे तिसऱ्यांदा भंगले स्वप्न
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर (हिं.स.) : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. मात्र भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. सामना संपताना पाणावलेले डोळे आणि हताश चेहरे, असे काहीसे स्टेडियमवर पहायला मिळाले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या ११व्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
विश्वचषकाच्या अंतिम महामुकाबल्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावत २४१ धावा करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलिया संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १४१ धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८, मिचेल मार्शने १५ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर सात, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.
रोहितने यावेळी मास्टरप्लॅन अमलात आणला. मोहम्मद शमीला सुरूवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आणले आणि शमीने ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत दोन गडी बाद केले. पण ऑस्ट्रेलियाने धावगती (रन रेट) खाली पडू दिला नाही. रोहितने फिरती गोलंदाजांना उतरवले आणि ऑस्ट्रेलियाने लय पकडली. ट्रॅव्हिस हेडने झंझावती शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याने १२० चेंडूत १३७ धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने चार षटकार आणि १५ चौकार मारले. दरम्यान ४७ धावांवर तिसरा गडी बाद झाल्यानंतर लाबुशेन याने संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. लाबुशेनने ११० चेंडूमध्ये नाबाद ५८ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.
ट्रॅव्हिस हेड आणि लाबुशेन या जोडीपुढे एकाही भारतीय गोलंदाजाची डाळ शिजली नाही. शमी आणि बुमराह यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संधीच दिली नाही. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा ही फिरकी जोडीलाही गडी बाद करण्यात यश आले नाही. जाडेजाने १० षटकांत ४३ धावा खर्च केल्या. तर कुलदीप यादव याने १० षटकांत ५६ धावा दिल्या. या दोघांनाही गडी बाद करण्यात अपयश आले. बुमराहने दोन, शमीला एक आणि सिराजला एक गडी बाद करता आला.
ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वांत यशस्वी संघ
या अगोदर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाने २००३ मध्ये भारताचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने याआधी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वांत यशस्वी संघ ठरला आहे.
हिंदुस्थान समाचार
