अलिबाग, 1 ऑगस्ट (हिं.स.)। देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना अलिबाग तालुक्यातील कुर्डुस विभागात असणारी कामतवाडी आदिवासीवाडी हे अध्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. कामतवाडीती येथील यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
गावातील रुग्णाला उपचारासाठी आणायचे असेल तर साडेतीन किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे. विशेष म्हणजे या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने आदिवासी बांधव रुग्णाला झोळीच्या आधाराने चालत कुर्डुसपर्यंत घेऊन येतात. या वेदीवरील रस्त्याची लोकप्रतिनिधींना आठवण होते ती फक्त निवडणुकीच्या कालावधीतच. त्याचवेळी येथील ग्रामस्थाना रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले जाते. अशा अनेक निवडणुका येथील ग्रामस्थानी पहिल्या, मतदानही केले. परंतु गावात रस्ता अध्याप झालाच नाही आणि वाडी मुख्य प्रवाहात अद्यापही आलेली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
कामतवाडी डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव आहे. गावाची लोकसंख्या ३६० एवढी आहे. परंतु गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
या गावात गेल्या दहा वर्षांपूर्वी पंडित पाटील आमदार असताना त्यांनी विजेची असणारी गरज भागवली होती. आमदार पंडित पाटील या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावाला जोडणारा रस्ता तयार करणार होते. परंतु त्यानंतर या गावातील ग्रामस्थांचे उत्तम आणि गुणवत्ता पूर्ण रस्त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. या गावातील ग्रामस्थ रस्ता कधी होणार ? याकडे चातकाप्रमाणे डोळे लावून वाट पाहत आहेत. गावात रस्ता झाला तर गावातील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर आरोग्याचा भेडसावणारा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant
