ठाणे, 30 डिसेंबर, (हिं. स) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना 11 जुलै 1985 रोजी झाली आहे. महामंडळाच्या भागभांडवलात भरघोस वाढ होऊन महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 1 हजार कोटी झाले आहे. मंजूर भागभांडवलापैकी सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 100 कोटी प्रमाणे 200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी शासनाकडून 100 कोटी निधी प्राप्त झाला असून 31 मार्च 2024 पर्यंत उर्वरित 100 कोटी प्राप्त होणार आहे.
महामंडळामार्फत खालील नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात येत आहे-
अ) एन.एस.एफ.डी.सी.योजना :- (राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली) या महामंडळाचे रु.105 कोटी रुपये थकीत असल्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळणे 2015 पासून बंद होते परंतू सर्व थकित रक्कम भरणा केल्यामुळे मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा रु.5,00,000/-, महिला समृध्दी योजना प्रकल्प रक्कम रु.4,40,000/-, लघुऋण योजना प्रकल्प रक्कम रु.1,40,000/- या तीन योजनेसाठी 3500 लाभार्थी करिता रु.100 कोटी निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळास मान्यतेसाठी सादर केलेले आहे. एक महिन्यामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन एन.एस.एफ.डी.सी.महामंडळाने दिलेले आहे.
मातंग समाजाच्या युवक, युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी रु.30,00,000/-(तीस लाख मात्र) व परदेशांतर्गत शिक्षणासाठी रु.40,00,000/- (चाळीस लाख मात्र) कर्ज देण्याकरिताचे प्रस्ताव या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागविलेले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी. च्या निधीमधूनच मंजुरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
1. थेट कर्ज योजना – प्रकल्प मर्यादा रु.1,00,000/- (एक लाख) या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1207 लाभार्थ्यांना 12 कोटीचे कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेर 800 लाभार्थ्यांना रु.8.00 कोटी रुपयाचे वाटप केलेले आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1650 व आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1 हजार 650 व आर्थिक 16.50 कोटी ची तरतूद केलेली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही चालू आहे.
2. बीजभांडवल योजना – या योजनेची प्रकल्प मर्यादा रु.7,00,000/- (रु.सात लाख) असून यामध्ये महामंडळामार्फत रु.10,000/- अनुदानासहित 20% रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता परंतु लहुजी साळवे आयोग अभ्यास गटाच्या 19 मंजूर शिफारशीपैकी क्र.01 च्या शिफारशीच्या अनुषंगाने या योजनेमध्ये महामंडळाचा हिस्सा 20% वरुन 45% करण्यात आला आहे. ही रक्कम ४% व्याजाने दिली जाते, लाभार्थीचा सहभाग 5% असून उर्वरीत 50% बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिश्याचे रक्कम 20% वरुन वाढवून 45% केल्यामुळे बँकाकडून कर्जमंजूरीकरिता वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
3. शिष्यवृत्ती योजना – मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरिता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये प्रतिवर्षी 10 वी,12 वी, व पदवी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 वी साठी 1000/-, 12 वी साठी रु.1500/- व संचालक मंडळाच्या मान्यतेने चालू आर्थिक वर्षापासून यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून 10 वी साठी रु.5000/-, 12 वी साठी रु.7500/- व पदवी व पदवीकासाठी रु.10,000/- पदव्युत्तर साठी रु.12,500/-इतकी वाढ करण्यात आली असून आगामी संचालन मंडळाच्या बैठकीत पुन्हा या रक्कमेमध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळास सादर करण्यात येणार आहे.
4. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर रु.30,00,000/-(रु.तीस लाख) प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.
5. थेट कर्ज योजना – सध्या महामंडळामार्फत रु.1,00,000/- (एक लाख मात्र) प्रकल्प मर्यादा असलेली थेट योजना राबविण्यात येते परंतु या रक्कमेमध्ये मोठे व्यवसाय करणे शक्य होत नसल्यामुळे योजनेची प्रकल्प मर्यादा रु.5,00,000/- (रु.पाच लाख मात्र) पर्यंत करण्याकरिता समाजाकडून वारंवार मागणी होत होती, त्या अनुषंगाने या योजनेची प्रकल्प मर्यादा रु.5,00,000/- (रु.पाच लाख मात्र) पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून राज्यशासनाकडून याबाबतची मान्यता लवकरच मिळणार आहे.
6. लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशीपैकी 19 शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संबंधित आहे. या 19 असलेल्या शिफारशीमध्ये दोन टप्पे करुन पहिल्या टप्प्यातील नऊ शिफारशीकरिता 234 कोटी व उर्वरीत 10 शिफारशीकरिता रु.221 कोटी असे एकूण रु.455 कोटी इतका निधी मिळण्याकरिताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे.
7. अंधेरी मुंबई तसेच तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील जागेबाबत- मुंबई-अंधेरी येथे 387 चौ.मी. महामंडळाच्या मालकीची जागा असून या जागेवर अण्ण्णाभाऊ साठे भवन व बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरिता रु.50 कोटी तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी मातंग समाजाच्या युवक,युवतीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरिता नगरपालिका, तुळजापूर यांच्या मालकीची 1 एकर जागा या महामंडळास उपलब्ध करुन दिली असून या जागेवर सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारणीकरिता रु.50 कोटी निधी मिळण्याकरिताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.
8. जाचक अटी शिथील करण्याचा प्रस्ताव- महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात कर्जाचे वितरण करताना दोन सक्षम जामीनदार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घेण्यात येतात जामीनदार घेण्याकरिताची अट शिथील करण्याकरीता समाजातील कार्यकर्ते, सामाजिक संघटक व समाजबांधवाकडून निवेदने प्राप्त झालेली आहेत. त्यानुषंगाने संबंधित अट शिथील करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.
तरी गरजू लाभार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अणा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
