ठाणे, 30 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवार, १ डिसेंबर रोजी दु. १२ ते रा. १२ असे १२ तास एमआयडीसीकडून येणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या दुरुस्तीच्या काळात, ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीतील सर्व भाग तसेच, वागळे प्रभाग समिती रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर, तसेच, मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहील.
वरील दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हिंदुस्थान समाचार
