
जळगाव, 4 सप्टेंबर (हिं.स.) : दिवसभर गल्ली बोळात , कचरा कुंडीत कागद कचरा वेचणारी मुले ,ज्यांनी शाळाच पाहिली नाही .,केवळ लहान वयात पोटातील भूक शमवण्यासाठी कचरा वेचणे हेच त्यांचे काम.यात बालपण विसरलेल्या या मुलांनी वेचलेल्या कच-याचे पैसे करून त्यावर उदरनिर्वाह करणारे त्यांचे पालक , मुले शाळेत गेली तर पैसे कोठून आणयचे हा स्वार्थी विचार पालकांचा .या मुलांनी कचरा वेचतांना ,रस्त्याने जाता येतांना पाहिलेल्या असतात शासकीय कार्यालयांचया भव्य इमारती ..बुधवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या मुलांना त्यांच्या दालनात बोलावून यांच्या समवेत तासभर संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी केली.
जळगावची साई इच्छा फाऊंडेशन ही संस्था कचरा वेचणा-या मुलांसाठी काम करते आहे . आज ७० वर मुले त्यांच्या संपर्कात आहेत .संस्था सदस्य पत्रकार वाल्मिक जोशी म्हणाले की , आमच्या संस्थेकडून या मुलांना साक्षर बनवण्याचा प्रयत्न केला जातो. दर रविवारी आम्ही त्यांना शिकवत असतो .किशोर वयीन मुलींना गुड टच बॅड टच शिकवले याचा त्यांना उपयोग होत आहे . या मुलांमधील सुप्त गुण प्रकट व्हावेत म्हणून चित्रकला शिकवण्याचा प्रयोग हाती घेतला.
हातात कधीही रंगाचा ब्रश न घेतलेल्या या मुलांसाठी या संस्थेने गणेशोत्सव निमित्ताने गणपती रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती .बाप्पा रंगवतांनाचा आनंद ,उत्सुकता आणि प्रसन्नता या मुलांच्या चेह-यावर जाणवत होती. या उपक्रमाची ही गोष्ट जिल्हाधिकारी यांना कळताच त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली शिरापुरे ,पत्रकार वाल्मिक जोशी यांच्या माध्यमातून मुलांना बोलावत त्यांच्याशी संवाद साधला संस्थेने जिल्हाधिकारी यांच्या हातून रंगभरण स्पर्धोतील यशस्वी मुलांना प्रशस्तीपत्र , रंगपेटी व चित्रकला वही देण्यात आली.
जिल्हाधिकारी दालनात आलेली ही मुले प्रथम गप्प होती .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांना गप्पा गाण्यांच्या माध्यमातून बोलके केले.या मुलांना भावी काळात काय व्हायचे आहेअसे त्यांनी विचारता तुमच्या सारखे मोठे व्हायचे असे उत्तर जिल्हाधिकारी यांना मिळाले तर त्यांच्या मनातील इच्छा विचारता आम्हाला शाळेत जावस वाटत असे मुलांनी सांगितले .त्यांच्या अन्य अडचणी विचारता एकाने स्नानासाठी पाणी मिळत नसल्याची तक्रार केली .या मुलांच्या किमान गरजा पूर्ण होत नसल्याचे दिसताच जिल्हाधिकारी गहिवरले .त्यांनी या मुलांच्या जीवनातील अंधार दूर व्हायला हवा ,ज्ञानाचा दिवा लावायला हवा असे सांगत या कचरा वेचणा-या मुलांचे आधार कार्ड बनवणार असून या मुलांना शाळेत प्रवेश , त्यांना शाळेचे साहित्य गणवेश ,जेवणाची व्यवस्था ,मेडिकल चेक अप करणार असल्याची ग्वाही दिली . शासन यादीत या मुलांचा समावेश करण्या बाबत त्यांनी सूचना दिल्या .शेवटी या मुलांना जिल्हाधिकारी चहा नाश्ता देऊन निरोप घेतला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली शिरापुरे ,सचीव आनंद शिरापुरे, वाल्मिक जोशी उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
