दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट
नवी दिल्ली, 30 डिसेंबर (हिं.स.) : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र धुके दाटले असून विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक गाड्या 1 ते 19 तास उशिराने धावत आहेत.
उत्तर भारतातील 32 जिल्ह्यांत धुक्याचा रेड अलर्ट देण्यात आला. दृश्यमानता कमी झाल्याने शुक्रवारी उत्तरेकडून मनमाड, नाशिकमार्गे मुंबई तसेच मराठवाड्याकडे धावणाऱ्या रेल्वे किमान 1 व कमाल 19 तास विलंबाने धावत होत्या. प्रतिकूल हवामानामुळे पुणे विमानतळावरून गुरुवारी 14 आणि शुक्रवारी 8 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यासोबतच हैदराबाद, दिल्ली, लखनऊ, चंदीगड, अमृतसर, अहमदाबाद आणि गोवा येथून विमाने पुण्यात येऊ शकली नाहीत. त्यामुळे ती परतीच्या प्रवासालाही जाऊ शकली नाहीत. अचानक विमान रद्द झाल्याने या विमानांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांचा ऐनवेळी खोळंबा झाला.
अमृतसर- नांदेड सचखंड एक्स्प्रेस 19 तास उशिरा धावत असून निजामुद्दीन-कोल्हापूर गाडी 17 तास उशिरा धावते आहे. यासोबतच अयोध्या- कुर्ला तुलसी एक्सप्रेस 16 तास, एर्नाकुलम- निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस 9 तास, फिरोजपूर- मुंबई पंजाब मेल 12 तास, वाराणसी- मुंबई महानगरी 5 तास, हावडा- मुंबई मेल 3 तास, भुनेश्वर- कुर्ला गाडी 2 तास, पाटलीपुत्र- कुर्ला 2 तास, अयोध्या- कुर्ला रेल्वे 4 तास, जम्मूतावी- पुणे झेलम आणि निजामुद्दीन-वास्को गोवा या गाड्या 10 तास तसेच विशाखापट्टणम- शिर्डी रेल्वे 2 तास उशिरा धावते आहे.
हिंदुस्थान समाचार
