संभल, 19 फेब्रुवारी : देशात नव्या युगाची सुरुवात झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उत्तरप्रदेशातील संभल इथल्या कल्की धाम मंदिराच्या शिलान्यास प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज, उत्तर प्रदेशच्या भूमीवरुन भक्ती आणि अध्यात्माचा आणखी एक प्रवाह सुरु झाला आहे. आणखी एका पवित्र क्षेत्राचा पाया रचला जात आहे. भव्य कल्की मंदिराच्या शिलान्यासाचं भाग्य मला मिळाले आहे. मला विश्वास आहे की, कल्की धाम भारतीय आस्थेचे एक विराट केंद्र म्हणून पुढे येईल. देशात एकीकडे तीर्थ क्षेत्रांचा विकास हतोय. तर दुसरीकडे शहरांमध्ये हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहात आहे. आज मंदिरे उभी राहात असली तरी देशात मेडिकल कॉलेज तयार होत आहेत. एक नवीन युगाची सुरुवात यानिमित्ताने होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांचा देखील समाचार घेतला. आजघडीला जर सुदाम्याने कृष्णाला तांदुळ दिले असते तर त्यावरून भगवान श्रीकृष्णावर आरोप झाले असते अशा काळात आपण जगत असल्याचे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले.
या कार्यक्रमात आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, सगळ्यांकडे देण्यासाठी काही ना काही असते. परंतु माझ्याकडे काहीच नाही. त्यांच्या कथनाच्या अनुषंगाने पंतप्रधान म्हणाले की,
मी केवळ भावना व्यक्त करु शकतो. बरे झाले मला काही दिले नाही. नाहीतर जमाना एवढा बदलला आहे की, आजच्या युगात सुदामाने श्रीकृष्णाला तांदूळ दिले असते तर त्याचा व्हिडीओ बाहेर आला असता. सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली असती आणि निकालात श्रीकृष्णाला भ्रष्ट मार्गाने काहीतरी दिले, असं सिद्ध झाले असते. भगवान कृष्ण भ्रष्टाचार करत होते, असे म्हटले गेले असते. अशाच काळात आपण जगत असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला.
