चंदीगड, 06 मे : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्याला स्टंट म्हंटले आहे. या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला होता. चन्नी यांच्या या विधानाचा भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी समाचार घेतला आहे. काँग्रेस नेहमीच देश आणि देशभक्तांचा अपमान करते आता पुन्हा चन्नी यांनी जवानाच्या बलिदानाचा अपमान केल्याचे सिरसा यांनी म्हंटले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे शनिवारी 4 मे रोजी वायुसेनेच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले होते. तर 4 जवान जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी पुंछमध्ये झालेला हल्ला हा भाजपाला लोकसभा निवडणुकी विजय मिळवून देण्यासाठी केलेला स्टंट असल्याचा दावा केला आहे. चन्नी यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. तसेच भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी चन्नी यांचे वक्तव्य हे भयानक आणि सैनिकांचा अपमान करणारे असल्याचे सांगितले.
चरणजीत सिंग चन्न हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधीत प्रश्नावर उत्तर देताना चन्नी म्हणाले की, ही स्टंटबाजी सुरू आहे. हल्ले होत नाही आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा भाजपाला विजयी करण्यासाठी अशी स्टंटबाजी केली जाते. त्यात सत्य काही नाही, असा दावा चन्नी यांनी केला होता. जनतेच्या जीवनाशी आणि शरीराशी कसे खेळायचे, याची भाजपाला पुरेपूर जाणीव आहे, असा दावाही चन्नी यांनी केला.
दरम्यान, भाजपाने पुंछमधील हल्ल्याबाबत चन्नी यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, काँग्रेसवाले सांगताहेत की, जवानांना निवडणुकीमुळे शहीद करण्यात आले. ही मानसिकता भयावह आणि देशाची सेवा करणाऱ्यांसाठी अपमानक आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि राहुल गांधी एकमेकांना पाठिंबा देत आहेत. काँग्रेस भारतीय जवानांच्या बलिदानाची अवहेलना करत आहे, असा आरोपही सिसरा यांनी केला.
