नागपूर , काँग्रेसने राजस्थान, हिमाचलप्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन पर्ण केले नाही. त्यामुळे काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे. त्यांच्या जाहीरनाम्याला एका कागदाच्या तुकड्या इतकीच किंमत असल्याचे टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. नागपुरच्या प्रेसक्लब येथे आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रवीण दटके, आ.मोहन मते प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, आपण निवडून येणार नसल्याची खात्री असल्याने उद्या, राहुल गांधी प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासन देऊ शकतात. परंतु, भाजप असे करीत नाही. आम्ही 2019 मध्ये जाहीरनाम्यात दिलेली सर्वच्या सर्व 75 आश्वासने पूर्ण केली आहेत. भाजपचे संकल्पपत्र कागदी नाही, ती मोदींची गॅरंटी आहे. देशातील सर्व घटकांचा विकासाचा संकल्प यातून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेवढ्या सरकारी जागा रिकाम्या आहेत त्या सर्व भरण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात समान नागरी कायदा लागू व्हावा हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्येदेखील ते नमूद होते. देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे महिलांना देखील समान अधिकार मिळतील, असा दावा फडणवीस यांनी केला. ओबीसींच्या मुद्यावर फडणवीस म्हणाले की, भाजप सरकारने ओबीसी कल्याणासाठी पुढाकार घेतला. काँग्रेस सरकारने 70 वर्ष ओबीसींसाठी संवैधानिक आयोग नेमला नाही. तो आम्ही नेमला. सर्वात जास्त ओबीसी मंत्री या मंत्रीमंडळात आहे. केंद्रातील 60 टक्के मंत्री ओबीसी, एससी, एसटी आहे. राज्यात तर ओबीसी मंत्रालय तयार झाले व ओबीसी हिताचे 30 निर्णय झाले. काँग्रेसला ओबीसींच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांनी ओबीसींचा केवळ व्होटबॅंकसारखा वापर केला, असा आरोप फडणवीस यांनी लावला.
काँग्रेसकडून संविधानासंदर्भात होणाऱ्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मागील 10 वर्ष भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. मात्र, आम्ही सातत्याने संविधानाचे रक्षण केले. भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलल्या जाईल हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही व जनहिताचे कार्य करता येत नाही अशा वेळी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही राहुल गांधी यांना दोष देणार नाही. कारण ते वाचतच नाही. कुणीतरी काहीतरी लिहून दिले असणार. मल्लिकार्जून खर्गे देशाबाबत बोलत आहेत. मात्र कर्नाटकमध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण करू शकलेले नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे असा टोला फडणवीस यांनी लगावला.
