राजधानी गँगटोकला आणण्यास सुरूवात
गँगटोक, 14 डिसेंबर (हिं.स.) : पूर्व सिक्कीममधील चांगू-नाथुला येथे बुधवारी खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे 800 हून अधिक पर्यटक अडकून पडले होते. याबाबत माहिती मिळताच भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरच्या जवानांनी तातडीने कारवाई करत अडकलेल्या पर्यटकाला वाचवले. या पर्यटकांना जेवण औषधे पुरवून आज, गुरुवारी सिक्कीमची राजधानी गँगटोक येथे आणण्यास सुरूवात झालीय.
सिक्कीममध्ये बुधवारी (13 डिसेंबर) दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. तापमानाचा पारा खाली येताच राज्यातील उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन पूर्व सिक्कीममधील चांगू-नाथुला या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी गेलेले पर्यटक वाटेतच अडकले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते, असे भारतीय सैन्याने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पर्यटकांना निवास, उबदार कपडे, वैद्यकीय मदत आणि गरम जेवण देण्यात आले. अडकलेल्या पर्यटकांना सामावून घेण्यासाठी सैनिकांनी त्यांच्या बॅरेक रिकाम्या केल्या.जवानांच्या तत्काळ कारवाईमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या सिक्कीममधील हवामानाने गंभीर वळण घेतले असून बहुतांश भागात प्रचंड थंडी आहे. लाचुंग आणि त्याच्या वरच्या भागांसह उत्तर सिक्कीमच्या काही भागात हिमवर्षाव सुरू आहे. रावंगलासह काही भागात गारपीट झाली आहे. दरम्यान सैन्यासोबतच सिक्कीम सरकार आणि स्थानिक टुरिस्ट कंपन्यांनी देखील युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलेय.
हिंदुस्थान समाचार
